मुंबई: कारागृहात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करोनाबाधीत क्षेत्रातील कारागृहे तातडीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात येत आहेत, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

संबंधित कारागृह अधीक्षकांनी कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन शिफ्टमध्ये करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था आतच करण्यात यावी. मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

कारागृहात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर देण्यात येतील. जर कुटुंबाला काही अडचण भासली तर त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधावा. ज्यायोगे त्यांच्या अडचणीचे निराकरण होईल, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे. सर्व संबंधित कारागृहांना तातडीने याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here