मुंबई: महाबळेश्वरला पळून गेलेले कपिल वाधवान व त्यांच्या बंधूंना ताब्यात घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक मुंबईहून रवाना झाले आहे. आज ते वाधवान बंधूंना घेऊन मुंबईत परतणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधूंचा अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची कनेक्शन तसेच येस बँकेकडून घेतलेले कर्ज थकित झाल्याप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्डरिंग कायद्यांतर्गत तपास सुरु आहे. यापैकी इक्बाल मिर्ची प्रकरणात त्यांना फेब्रुवारी महिन्यात जामीन मिळाला आहे. तर येस बँक प्रकरणी तपास अद्याप सुरु आहे. पण हा तपास सुरु असतानाच वाधवान बंधूंनी मुंबईबाहेर पळ काढल्याने व त्यातही संचारबंदी तसेच लॉकडाऊनच्या काळात प्रवास केल्याबद्दल ईडीने त्यांना परत आणण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

दरम्यान, करोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयाच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. जिल्हा ओलांडून कोणालाही प्रवेश दिला जात नाही. असे असतानाही बुधवारी रात्री कपिल वाधवान यांनी आपल्या कुटुंबातील ९ सदस्य तसेच वाहनचालक, खानसाम व इतर १४ कर्मचारी यांना घेऊन खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला. रात्री उशिरा हे सर्वजण महाबळेश्वरमधील बंगल्यात दाखल झाले. विशेष म्हणजे या प्रवासात त्यांना कुठेही अडवण्यात आले नाही. दरम्यान, याबाबत महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी माहिती मिळाली आणि त्यांनी तातडीने ही माहिती तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांना दिली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. त्यानंतर या सर्वांना आता पाचगणीत हलवून तिथे शासकीय इमारतीत क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे वाधवान कुटुंबाला खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्याची परवानगी कशी मिळाली, याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here