शक्य तेवढं सत्कर्म करत राहिलं पाहिजे. त्याचं चांगलं फळ मिळालं नाही, तरी एक वेळ चालेल; परंतु वाईट कर्माचं फळ मिळाल्यावाचून राहत नाही. असं म्हणतात की, आपण जसं वागतो, त्या कर्माची परतफेड पुढच्या जन्मी वगैरे नाही, तर याच जन्मात करावी लागते. आपले सगळे भोग भोगून होईपर्यंत आपली या जन्मातून सुटका नाही, त्यालाच ‘प्रारब्ध’ म्हणतात. प्रारब्धाचं गाठोडं हलकं करायचं असेल, तर चांगलं कर्म करत राहा, म्हणजे फळही चांगलंच मिळेल. अन्यथा केलेल्या कर्माचं फळ भोगायला तयार राहा, ही शिकवण आपल्याला लहानपणापासून विविध इसापनीतीच्या गोष्टीतून, बोधकथेतून मिळाली आहे. याच गोष्टीची उकल ‘ऑपरेशन रोमियो’ हा सिनेमा आपल्याला करून देतो.

‘करावे तसे भरावे’ असे म्हणत एक सणसणीत चपराक हा सिनेमा लगावतो. ‘ऑपरेशन रोमियो’ हा सिनेमा २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क-नॉट लव्ह स्टोरी’ या मल्याळी सिनेमाचा रिमेक आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. सिनेमाचा हिंदीत रिमेक होताना कथानकाचा आवेश दाक्षिणात्य राज्यातून मुंबई शहरात आला आहे. खरं तर, ठिकाण कोणतंही असो, राज्य, देश कोणताही असो, ही घटना किंवा हे असे प्रसंग कुठंही घडू शकतात; किंबहुना घडतातही. तीच आपल्या आजूबाजूची गोष्ट दिग्दर्शक शशांत शाहनं मोठ्या पडद्यावर दाखवली आहे.

सिनेमाचे दोन भाग एकमेकांचा विरूद्ध आरसा आहेत. जे जे पूर्वार्धात घडते तसेच ते उत्तरार्धात विरूद्ध दिशेने घडते. उपरोक्त लिहिल्याप्रमाणे केलेल्या कर्माची परतफेड होताना आपल्याला दिसते. हा परतफेडीचा सिलसिला सिनेमा म्हणून अत्यंत रंजक आहे. जो रटाळपणा आपल्याला सिनेमाचा पूर्वार्ध पाहताना जाणवतो, तितकीच वेगवान रंजकता सिनेमाच्या उत्तरार्धात आहे. दिग्दर्शकाला सिनेमाच्या पूर्वार्धातील पटकथा एकसंध बांधता आलेली नाही. प्रसंग मुद्दाम खेचल्यासारखे जाणवतात. कथानकातील विविध परिस्थितींमधील तणाव आपल्याला प्रारंभी पडद्यावर दिसतो; पण ती प्रसंगांमधील गंभीरता मध्यांतरापर्यंत टिकून राहत नाही.

आदित्य () आणि नेहा () हे प्रेमी युगुल रात्रीच्या वेळी लाँग ड्राइव्हवर निघालेले असतात. नेहाचा वाढदिवस ‘नाइट आउट सेलिब्रेशन’ करायचं ठरवलेलं असतं. सर्व आलबेल सुरू असतं; पण दुधात मिठाचा खडा पडावा; तसे दोन पोलिस कर्मचारी आदित्य आणि नेहाला मुंबईच्या रस्त्यांवर पार्किंगमध्ये पकडतात. सब-इन्स्पेक्टर अशी ओळख देणारा मंगेश () त्यांच्यावर कारवाई करणार असं सांगतो. या प्रकरणामुळे आदित्य आणि नेहा घाबरून जातात. सोबत असलेला हवालदारदेखील () या प्रेमी युगुलाला काहीसा त्रास द्यायला सुरुवात करतो. या पोलिस प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी आदित्य त्यांना ३५ हजार रुपये लाच देऊ करतो. दरम्यान नेहाबरोबर काही तरी चुकीचं झाल्याचं आदित्यला वाटतं. कसे बसे आदित्य आणि नेहा या प्रकरणातून सुटतात; पण झाल्या प्रकरणाबाबत सूड घेण्याच्या उद्देशानं आदित्य पुढं काय करतो हे सिनेमात पाहणं मनोरंजक आहे. घडलेल्या प्रसंगानंतर नेहा पुढे काय करते, हेही बोधपूर्ण आहे. सिनेमाचा उत्तरार्ध कथानकाला सकस वळण देणारा ठरतो.

‘मंगेश’च्या भूमिकेत शरद केळकरनं उत्तम काम केलं आहे. सिद्धांत गुप्तानंही त्याच्या व्यक्तिरेखेतील दोन छटा चोख दाखवल्या आहेत. किशोर कदम यांनी उत्कृष्ट काम केलंय. त्यांच्या तोंडी असलेले संवाद, देहबोली आणि एकदंरच अभिनिवेश त्या व्यक्तिरेखेला उंचावणारा ठरतो. दिग्दर्शकीय पातळीवर कमी-अधिक प्रमाणात साधारणपणे ठीक ठाक काम झालं आहे. कथानक विशेषतः पूर्वार्ध अधिक रंजक करता आला असता. सिनेमातील संवाद आणि त्या सोबत असलेली शाब्दिक खेळी उत्तरार्धात आपलं लक्ष वेधून घेते. तांत्रिकदृष्ट्या सिनेमा चांगला झाला आहे. गोष्ट आणि कलाकारांच्या सादरीकरणासाठी हा सिनेमा नक्की बघायला हवा.

सिनेमा : ऑपरेशन रोमियो

निर्मिती : शीतल भाटिया, नीरज पांडे

दिग्दर्शक : शशांत शाह

लेखन : रतिश रवी, अर्शद सय्यद

कलाकार : शरद केळकर, सिद्धांत गुप्ता, वेदिका पिंटो, किशोर कदम

संकलन : प्रवीण कथिकुलोथ

दर्जा : तीन स्टार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here