ते पुढे म्हणाले की, ‘संजय राऊत आणि शिवसेनेला मी धन्यवाद देईन की जर ते मागच्या २४ ऑक्टोबर २०१९ ला सोबत आले असते तर त्यांनी बेईमानी केली नसती. त्यामुळे २०२४ मध्ये पुन्हा आम्हाला युतीचं सरकार आणावं लागलं असतं. पण कदाचित त्यांनी भविष्यात भाजपचं एकट्याचं सरकार यावं आणि महाराष्ट्राची उन्नती व्हावी, कुठेही स्पीड ब्रेकर कामात नसावा. या एका भव्यदिव्य विचाराने आमच्याशी बेईमानी केली. आता जनता बेईमानीचं उत्तर २०२४ मध्ये दाखवेल. त्यांना आम्ही धन्यवाद देतो. त्यांनी जी बेईमानी आमच्यासोबत केली, त्यातून आम्हाला निश्चितपणे उत्साह, ऊर्जा प्राप्त होऊन २०२४ मध्ये सरकार येईल, यात शंका नाही.’
राणा दाम्पत्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका
दरम्यान, मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचनाला घेऊन राणा दाम्पत्या विरोधात जे शिवसेनेचे आंदोलन सुरू आहे. यावरही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘एखादं आंदोलन घोषित केल्यानंतर महत्वाच्या विषयावर चर्चा करून संवाद केला जायचा. आजपर्यंत अशी प्रथा होती. पण हे सरकार पूर्णपणे संवाद शून्यतेकडे जाणारे सरकार आहे. मला आठवते पंढरपूर इथे जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस पूजेला येऊ नये, असे सांगितले होतं. तेव्हा फडणवीसांनी मोठ्या मनाने आंदोलनाची घोषणा केली, त्यांच्याशी संवाद केला.’
‘शेवटी तुम्ही आज राज्यकर्ते आहात. जेव्हा एखादा आमदार, खासदार आपली मागणी रेटतात. तेव्हा मुख्यमंत्री म्हणून प्रशासन किंवा राज्याकर्त्यांनी संवाद साधत त्यांची भूमिका समजून घेण्याची आवश्यकता आहे. पण आज जे सरकार आहे ते सरकार आपल्या विरोधकांवर सुडबुद्धीने वागवत विरोधकांना कशा पद्धतीने संपवता येईल असा विचार असणार हे सरकार आहे. कौरवांनी लाजवं अशा पद्धतीने हे सरकार राज्यात चाललं आहे’, अशी टीका यावेळी मुनगंटीवारांनी केली.