करोना व्हायरसमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेख समजली जात आहे. पण १५ एप्रिलला मात्र आयपीएलची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जुलै महिन्यात आयपीएल खेळवायची का, यावर विचार केला जाणार आहे.
सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे देशातील वातावरण सामान्य नाही. देशातील वातावरण सामान्य होण्यासाठी जूनपर्यंतचा कालावधी जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जर जून महिन्यात देशातील वातावरण सामान्य झाले तर जुलै महिन्यात आयपीएल खेळवण्यात येऊ शकते. त्यामुळे आता बीसीसीआयचा जुलै महिन्यात आयपीएल खेळवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी बीसीसीआयला मे आणि जून या महिन्यात भारतात कशी परिस्थिती आहे, याचा पहिला अंदाज घ्यावा लागणार आहे.
सध्याच्या घडीला भारतामध्ये करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे आयपीएल स्पर्धा ही पुढे ढकलली गेली आहे. सध्याच्या घडीला बरेच खेळाडू, आयपीएल कधी खेळवणार यावर चर्चा करताना दिसत आहेत. पण यंदाची आयपीएल मात्र होणार नाही, असा खुलासा आयपीएल गर्व्हनिंग कौन्सिलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केला आहे.
याबाबत शुक्ला म्हणाले की, ” सध्याच्या घडीला करोना व्हायरसशी लढणे आणि लोकांचे प्राण वाचवणे ही प्राथमिकता आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला या गोष्टी़वरच जोर द्यायॉला हवा. आता वातावरण हे चिंताग्रस्त आहे. त्यामुळे जेव्हा वातावरण सामान्य होईल, तेव्हा आयपीएलबाबत चर्चा करता येईल. आयपीएल कधी खेळवायची हे बीसीसीआयच्या हातामध्ये असले तरी त्यांना भारत सरकारची त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. भारत सरकारच्या परवानगीशिवाय भारतामध्ये आयपीएल होऊ शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी १५ एप्रिलपासून आयपीएल होऊ शकत नाही, असे मला तरी वाटत आहे.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times