लखीमपूर खिरी येथे मागील वर्षी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थार गाडीखाली चिरडण्यात आलं होतं. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच त्याला पोलिसांनी अटकही केली होती. मात्र हायकोर्टाने जामीन मंजूर केल्याने आशिष मिश्रा तुरुंगातून बाहेर पडला होता. आशिष मिश्राच्या जामिनाला आव्हान देण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टात ४ एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. तेव्हा कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर १८ एप्रिल रोजी कोर्टाने आशिष मिश्रा याचा जामीन रद्द करत त्याला आत्मसमर्पण करण्याच्या सूचना दिल्या.
आशिष मिश्रानेच शेतकऱ्यांना चिरडलं?
सरकारविरोधात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालत त्यांना चिरडल्याची घटना लखीमपूर खिरी येथे घडली होती. या घटनेनंतर देशभर मोठा संताप व्यक्त करण्यात आला. तक्रारकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एफआयआर दाखल केली होती. ‘लखीमपूर खिरीमध्ये निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडणं हा केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि त्यांच्या मुलाचा एक सुनियोजित कट होता’, असा उल्लेख पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला होता. यानंतर उत्तर प्रदेश सरकारने एका चौकशी समितीची स्थापना केली. या समितीने ५ हजार पानांचा अहवाल दिला होता. तसंच या हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रा हाच मुख्य आरोपी असल्याचं सांगण्यात आलं होतं.