मुंबई: चार दशकांहून अधिक काळ मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीसह मालिका आणि नाटकांतील भूमिकांद्वारे रसिकांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांच्या अभिनयाची आजही चर्चा होताना दिसते. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी हिरोच्या आईची भूमिका साकारली. असं असलं तरी या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रींना रीमा त्यांच्या अभिनयातून टक्कर देत. त्यामुळं त्यांची भूमिका अनेकदा मुख्य भूमिकेच्या वरचढ ठरायची. त्यामुळं एका चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्रीनं रीमा यांच्या अनेक सीन्सला कात्री लावली होती. सध्या या किस्सा चर्चेत आला आहे.
‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कयामत सें कयामत तक’, ‘कल हो ना हो’, यासारख्या सिनेमांमधून शाहरुख खान, सलमान खान, काजोल, जुही चावला यांची ‘ग्लॅमरस आई’ म्हणून त्यांनी भूमिका साकारली होती. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या ‘वास्तव’मधील रघुभाईची कणखर आईची भूमिका चांगलीच गाजली होती. गुमराह या चित्रपटात रीमा, संजय दत्त श्रीदेवी यांच्या भूमिका होत्या. परंतु शूटिंग दरम्यान, श्रीदेवी यांनी रीमा याचा अभिनय पाहिला आणि त्यांना असुरक्षित वाटू लागलं. आपल्यापेक्षा रीमा यांचा अभिनय ताकदीचा आहे, हे लक्षात आल्यानंतर तिनं रीमा यांचे अनेक सीन चित्रपटातून काढून टाका, असं श्रीदेवींनी सांगितलं होतं.
श्रीदेवी चित्रपटात असणं हे चित्रपट हिट असल्यासारखं होतं, कोणताही निर्माता त्यांना नाराज करत नव्हता. त्यामुळं गुमराहमध्ये श्रीदेवींच्या सांगण्यावरून रीमा यांच्या अनेक सीन्सवर निर्मात्यांनी कात्री फिरवली होती.