अकोला शहरातील कैलास टेकडी परिसरात रहिवासी असलेली १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस स्टेशनला दाखल होती. या तक्रारीनुसार पोलिसांची मुलीचा शोध घेण्यास सुरुवात झाली. तपास पथके गठित झाले तांत्रिक सहकार्य व सूत्रांच्या माहितीनुसार, मुलीची माहिती हाती लागली. राजस्थान मध्यप्रदेश सीमेजवळ ही बेपत्ता मुलगी असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर खदान पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले.
यादरम्यान, तिच्या आईनेच या अल्पवयीन मुलीला विकल असल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी जन्मदात्या आईसह चौघांविरुद्ध विविध कलमान्वये ३६३, ३६६, ३७७, ३४ नुसार गुन्हे दाखल केले असून तिघांना अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले, गुन्हे पथकाचे डिगांबर अरखराव, विजय चव्हाण, रवी डाबेराव, रोहित पवार यांनी केली आहे.
८० हजार रुपयांसाठी केली होती मुलीची विक्री….
आईनेच स्वतःच्या मुलीला लग्नासाठी केवळ ८० हजार रुपयात विकलं असल्याचं पोलीस तपासातून समोर आले. या अल्पवयीन मुलीच्या आईने सुरुवातीला आपल्या मुलीला कैलास रामचंद्र घोपे (वय २८, राहणार मांजरी, ता. बाळापूर, जि. अकोला.) याच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर देवीबाई कैलास सावळे (राहणार, अकोट फैल, जि. अकोला.) हिच्या मदतीने मुलीला मध्यप्रदेशात पोहोचविण्यात आले. तिथे मानसिंह अर्जुनसिंह चव्हाण (वय ४०, राहणार जलारा, मध्यप्रदेश.) याच्याकडून लग्नासाठी ८० हजार रुपये घेतले अन् मुलीला त्याच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, मध्यप्रदेशमध्ये मुलीला विकल्यावर त्या ठिकाणी तिला १५ दिवसांवर आरोपी चव्हाण यांच्याकडे ठेवण्यात आले होते. यादरम्यान अनेक गोष्टी तिला सहन करावे लागल्या आणि १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न लावून देण्यात असल्याचे पोलीस तपासात समोर आले. आता तिच्यासोबत भयानक काही घडलं का? याचा तपासही पोलीस करणार आहेत.