‘वातानुकूलित रेल्वेच्या तिकीट दरात किती कपात करायला हवी, असं आम्ही वेगवेगळ्या स्तरातील लोकांना विचारत होतो. त्यावर कोणी म्हणत होतं ३० टक्क्यांनी दर कमी करा, कोणी म्हणत होतं २० टक्क्यांनी दर कमी करा. मात्र देशाचे पंतप्रधान हे नेहमी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेत असतात. त्यामुळे आम्हीही सामान्य माणसासाठी निर्णय घेत वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात करत आहोत,’ असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.
तिकीट दरात कसा झाला बदल?
रावसाहेब दानवे यांनी तिकीट दरात कपात करताना या निर्णयाविषयी सविस्तर माहिती दिली. ‘याआधी २५ किलोमीटरच्या प्रवासासाठी मुंबईकरांना १३५ रुपये मोजावे लागत होते. मात्र तिकिटाची ही रक्कम यापुढे ६५ रुपये इतकी असणार आहे. तसंच ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करणाऱ्यांकडून याआधी २०५ रुपये तिकीट आकारले जात होते, हे भाडे आता १०० रुपये इतके असणार आहे,’ अशी माहिती दानवे यांनी दिली.