Aamir Khan and Satyajit Bhatkal Majha Katta : शेतकऱ्यांनी गट शेती केल्यामुळे उत्पादन खर्च कमी येईल. तसेच शेतकऱ्यांच्या अनेक समस्या कमी होतील असे मत अभिनेता आमिर खान याने व्यक्त केले. आपल्याला परिसंस्था तयार करायची आहे. शेतकऱ्यांना आणखी ज्ञानी करण्यासाठी काम करायचे असल्याचे त्याने सांगितले. यावेळी आमिर खानने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ या स्पर्धेची घोषणा करुन शेतकऱ्यांना एक प्रकारचे गिफ्ट दिले आहे. या शेतकरी गटाला तज्ञांचे मार्गदर्शन देखील देणार असल्याचे त्याने सांगितले. आधी आम्ही पाणी जिरवले आहे, आता आम्हाला शिवार फुलवायचा असल्याचे तो म्हणाला.
मी गावात जन्मलो असतो तर आज मी वेगळा असलो असतो. फिल्म आणि शेती याचा जवळचा संबंध असल्याचे आमिर खानने सांगितले. शेतीमध्ये विविधता आहे. शेतकऱ्यांचे आणि आमच्या समस्या सारख्याच असल्याचे अमिरने सांगितले.
20 शेतकरी कुटुंबाचा सहभाग असणार
एक पीक एक गट यावर आधारीत ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ ही स्पर्धा आयोजीत केली आहे. गट शेतीतील स्पर्धकांना शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ यांनी सांगितले. या स्पर्धेत किमान 20 शेतकरी कुटुंबाचा सहभाग असणार आहे. राज्यपातळीवर यासाठी बक्षीसे दिली जाणार आहेत. राज्यपातळीवर प्रथम येणाऱ्या शेतकरी गटाला 25 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. दुसरे बक्षीस 15 लाख, तर तिसरे बक्षीस 10 लाख रुपये दिले जाणार आहे. एकूण 42 रोख बक्षीसे दिली जाणार असल्याचे भटकळ यांनी सांगितले.
1 हजार ग्रामपंचायतीमध्ये मोठे काम केले
पाणी फाऊंडेशनच्या कामाची सुरुवात झाली होती त्यावेळी 9 हजार ग्रामपंचायतीमध्ये काम सुरु केले होते. यातील 1 हजार ग्रामपंचायतीमध्ये मोठे काम केले. तिथे आता पाण्याची स्थिती खूप चांगली आहे. त्याठिकाणी आता गंज खात पडलेले टॅकर दिसत असल्याचे सत्यजित भटकळ यांनी सांगितले. आमचे ध्येय पुर्णपणे साध्य झाले नाही पण प्रक्रिया सुरु झाली आहे. पाण्याचे व्यवस्थापन हे सामुहिक पातळीवर झाले पाहिजे असे ते म्हणाले. त्यामुळेच सत्यमेव जयते फार्मर कप अशी स्पर्धा आयोजीत केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही दोघे जण शाळेत असल्यापासून एकत्र आहोत असे भटकळ यानी सांगितले. आमच्यामध्ये बरेच साम्य आहे. अनेक मुद्दे वेगळेही आमच्यात आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी अमिर खाने याने ‘एकजुटीन पेटलं रान तुफान आलया’ गाणं म्हणून सर्वांची मने जिंकली.