येणाऱ्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत. यावेळीही आघाडी सरकार निवडून येणार. पश्चिम बंगाल आणि केरळसारखे आपल्याला हिंदू द्रोही ठरवायचा प्रयत्न भाजप करत आहे. बंगालचं मोठं कर्तृत्व आहे. यावेळी ममता दिदींनी गेल्या वेळपेक्षा अधिक जागा मिळवल्या. आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र दिशा दाखवतो. आता महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवायची. हिंदूं मध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी अमराठी, ही भाजपची चाल आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
ते पुढे म्हणाले की, ‘संयुक्त महाराष्ट्र समिती कुणी आणि कशी फोडली? मुंबई आपण लढवून मिळवली. ती जनसंघाने जागांसाठी फोडली. त्यामुळे यांचं मराठी हिंदुत्वावर प्रेम नाही. यांना सगळं स्वतः करता हवं आहे. साहेब म्हणायचे जे कर्माने मरणार त्याला धर्माने काय मारायचे’, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केली आहे.
‘जन्मापासून शिवसेनेकडे नवीन तरुण रक्त आहे. गावागावातून शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या आणि बदल करा. पूर्वी शाखेचे बोर्ड होते, शाखा कार्यालय होते ते बघा, असं करत शिवसेना वाढवायची आहे. शिवसैनिक अंगार आहे. त्यामुळे भंगार आपल्याकडे बघणार नाही. फक्त त्यांना भेटून धीर द्या. आम्ही तुमच्यासोबत आहोत हे त्यांना समजू द्या. गावाची जनतेची कामंसुध्दा करून घ्या.’ अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे. इतकंच नाहीतर ‘शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे, हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. आता मी फिरणार’ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.