मुंबई : खासदार दौलतराव देशमाने यांच्या आयुष्यात आलेली चंद्रमुखी म्हणजेच चंद्रा जुन्नरकर यांच्यातील वेदनादायी प्रेमकहाणी असलेली कथा म्हणजे चंद्रमुखी. चंद्रमुखी सिनेमाने पहिल्याच दिवशी एक कोटीची कमाई केली. मोठ्या पडदयावर मराठीचं नाणं खणखणीत वाजवलं. दोन अडीच वर्ष या सिनेमासाठी मेहनत घेतलेल्या दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता आदिनाथ कोठारे, मृण्यमी देशपांडे, संगीतकार अजय-अतुल, कॅमेरामन संजय मेमाणे यांच्या मेहनतीचं चीज झालंय.

प्रियांका चोप्राची आई ‘चंद्रमुखी’च्या प्रीमिअरला उपस्थित, पाहा अजून कोण कोण आलं होतं ते

आज या सिनेमासाठी प्रेक्षकांनी भरूभरून प्रतिसाद दिला असला तरी हा चंद्रमुखी हा सिनेमा बनणारच नव्हता हे सत्य सिनेमा प्रदर्शित होताच समोर आल्याने प्रेक्षकांचे कान टवकारले आहेत. चंद्रमुखी कादंबरी वाचल्यापासूनच सिनेमा बनवायचा हे वेड डोक्यात घेतलेल्या प्रसाद ओकची तळमळ प्रत्येकानेच पाहिली आहे. मग चंद्रमुखी हा सिनेमा बनवणारच नव्हता हे सत्य काय आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना अस्वस्थ करत आहे.

मुळातच चंद्रमुखी ही कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या गाजलेल्या चंद्रमुखी या साहित्यकृतीवर आधारीत आहे. प्रसाद ओक या अभिनेता,दिग्दर्शकाच्या ही कादंबरी वाचनात आली. तो या साहित्याने आणि चंद्रमुखीच्या व्यथा, वेदना, शापित प्रेमकहाणीने भारावून गेला. ही कादंबरी केवळ पुस्तकात रहायला नको असं त्याला वाटलं आणि त्याचा प्रवास सुरू झाला. पहिलं आव्हान होतं ते विश्वास पाटील यांच्याकडून चंद्रमुखीचे माध्यमांतर करण्याच्या परवानगीचं. पण प्रसाद ओकला त्यांनी सुरुवातीला काही परवानगी दिली नाही. अजून थोडे दिवस थांब, दुसरा एखादा सिनेमा कर असं म्हणत विश्वास पाटलांनी चंद्रमुखी काही प्रसादच्या हवाली केली नाही. पण प्रसादचा कच्चा लिंबू सिनेमा पाहिल्यावर त्याच्या दिग्दर्शनावर त्यांनी विश्वास टाकला आणि चंद्रमुखी प्रसादकडे सोपवली. प्रसादने हा किस्सा अनेकदा शेअर केला आहे.


चंद्रमुखीच्या कामाला सुरुवात झाली. कादंबरीवरून पटकथा तयार झाली. कलाकारांची निवड झाली. वर्कशॉप झालं. शूटिंगचा नारळ फुटला आणि चंद्रमुखी मोठ्या पडद्यावर आली. पहिल्याच दिवशी या सिनेमाने एक कोटी रुपयांची कमाई केली. अजूनही चंद्रमुखीचा फिव्हर आहेच. पण चंद्रमुखी हा सिनेमा बनणारच नव्हता अशी एक चर्चा सुरू झाली आहे. सिनेमा नव्हे तर मग चंद्रमुखीच्या हक्कांसाठी प्रसाद ओक का धावपळ करत होता हा प्रश्न डोकावतोच. जेव्हा चंद्रमुखीचं माध्यमांतर करायचं असं ठरलं तेव्हा चंद्रमुखी सिनेमा नव्हे तर मालिकेच्या रूपात बनवण्याचा विचार प्रसाद ओकच्या डोक्यात आला. त्यानुसार त्याने एका वाहिनीला प्रस्तावही दिला.

सुबोध भावे

आजपासून तीन वर्षापूर्वी ही प्रक्रिया सुरू झाली. प्रसादची चंद्रमुखी म्हणून अमृता खानविलकर तर ठरली होतीच पण दौलतराव कोण साकारणार ही उत्सुकता होती. आता मोठ्या पडदयावर आदिनाथ कोठारे याने दौलतराव साकारला खरा, पण मालिकेत अभिनेता सुबोध भावे याच्यावर दौलतरावांचा शोध थांबला होता. त्यावेळी सुबोध शुभमंगल ऑनलाइन मालिकेच्या तयारीत होता. त्याची स्वत:चीही एक मालिका ऑन एअर होती. काशीनाथ घाणेकर सिनेमा करून नुकताच तो फ्री झाला होता. दौलतरावांचा करारीपणा, धुरंधरपणा सुबोध मालिकेसाठी पुरेपूर उतरवेल या हेतूने त्याची निवड केली. चंद्रमुखी मालिकेच्या रूपात करण्याचा प्रस्ताव एका वाहिनीला देण्यातही आला, पण वाहिनीकडून मिळणारी मंजुरी लवकर न मिळाल्याने प्रसादने मालिकेचा विचार बदलून सिनेमा करण्याचं ठरवलं.

‘वीर दौडले सात’ …महेश मांजरेकरांची मोठी घोषणा, हे असणार चित्रपटाचं वैशिष्ट्य

चंद्रमुखी सिनेमाबाबतच्या या सत्याचा उलगडा सिनेमा प्रदर्शित होताच झाल्याने प्रेक्षकांना आपल्या प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. बरं झालं मालिका बनवली नाही, चंद्रमुखी सिनेमातच छान शोभते अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. तर जी दौलतची भूमिका मालिकेत सुबोध भावे करणार होता त्यालाही अनेक प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे. चंद्रमुखी ही मालिकेसाठी रटाळ कथा झाली असती, सिनेमा हाच चंद्रमुखीला न्याय देणारे माध्यम आहे असं म्हणत प्रेक्षकांनी आपलं मत मांडलं आहे. प्रसाद ओकने चंद्रमुखीचे शिवधनुष्य पेललं हे बॉक्स ऑफिसवरच्या कमाईतून दिसतच आहे. पण चंद्रमुखी सिनेमाऐवजी मालिकेच्या माध्यमातून घराघरात येणार होती या हे सत्य ऐकून प्रेक्षकांनीही असं म्हटलं आहे की जे होतं ते चांगल्यासाठीच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here