नांदेड जिल्ह्यात बारड हे गाव आहे. नांदेड शहरापासून फक्त २० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावाची लोकसंख्या १० हजारांवर आहे. या गावात तुम्हला कुठेही भोंगे दिसणार नाहीत. यामुळे कुठल्याही वादाचा प्रश्नच येत नाही. भोंगे नसण्याचं कारण आहे ३० जानेवारी २०१७ ला बारड ग्रामपंचायतीने गावात भोंगे बंदीचा घेतलेला ठराव.
गावात भोंगे बंदीबाबात झालेल्या ठरावाला सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना होकार दिला. यामुळे या गावात गेल्या ५ वर्षांपासून भोंगे कधी वाजलेच नाहीत. मुदखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून बारड या गावाची ओळख आहे. गावाची लोकसंख्या १० हजार असून गावात सर्वच जाती धर्माचे लोक राहतात. भोंग्याच्या आवाजावरून या गावात देखील पूर्वी वाद व्हायचा. पण २०१७ मध्ये ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करत हा वाद कायमचा संपण्यात बारडच्या ग्रामस्थांना यश आलं.
गावात भोंगे नसल्यामुळे अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं. भोंगे नसल्याने गावात ध्वनी प्रदूषण देखील होत नाही. त्यामुळे लहान बालकं आणि वृद्धांची छान झोप होते. तसेच गावात वादही होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, गावात हिंदूंची एकूण ८ मंदिरे आहेत. तर एकच मशिद आहे. बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थळे म्हणजेच बौद्ध विहारे दोन आहेत. तर एक जैन मंदिर आहे. या सर्वच धार्मिक स्थळावर भोंगे नाहीत. धार्मिक स्थळांसोबतच गावात धार्मिक कार्यक्रम, राजकीय आणि सांस्कृतिक आशा कोणत्याही कार्यक्रमात भोंगे लावण्यास बंदी आहे. सध्या राज्यात भोंग्यावरून राजकीय वातावरण तापलं असताना नांदेड जिल्ह्यातील बारड या गावाने फक्त महाराष्ट्रासमोरच नव्हे, तर संपूर्ण देशासमोर आदर्श घालून दिला आहे. बारड गावचा आदर्श ठेवल्यास भोंग्यावरून होणारा वाद कायमचा संपवता येईल.

भोंग्याबाबत महाराष्ट्रातील ‘या’ गावाने संपूर्ण देशासमोर ठेवला आदर्श, काय घडलं असं? वाचा…