साथरोगाचा उद्रेक आणि लॉकडाउनमुळे गोव्यात ताण, नैराश्य, अस्वस्थता आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये वाढ झाली आहे, असा दावा मनोविकारतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मानसिक आरोग्य राखण्यासाठी ‘सायकॅट्रिक सोसायटी ऑफ गोवा’ने कोव्हिडएव्ही नावाची मोफत ऑनलाइन समुपदेशन आणि उपचार सेवा सुरू केली आहे. समुपदेशकांना मदतीसाठी येणारे फोन वाढले असून, त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचारातील पीडितांचे आणि अस्वस्थतेचा त्रास होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. ‘लॉकडाउन’ची संकल्पना भारतीयांसाठी अतिशय नवीन आहे. त्यामुळे त्याच्याशी जुळवून घेणे आपल्याला कठीण होत आहे,’ असे समुपदेशक अदिती तेंडुलकर यांनी सांगितले. अस्वस्थता, नैराश्य, पॅनिक अॅटॅक, भूक मंदावणे किंवा खूप वाढणे, भ्रम होणे, भीती वाटणे, वारंवार ‘मूड’ बदलणे, आत्महत्येचे विचार येणे, या समस्या लॉकडाउनच्या काळात वाढल्या आहेत, अशी माहितीही तेंडुलकर यांनी दिली.
‘ज्या लोकांना आधीपासून मानसिक आजार आहेत, अशांचे आजार या काळात बळावले आहेत. दारू किंवा इतर अंमली पदार्थ उपलब्ध नसल्याने व्यसनी लोकांचीही परिस्थिती बिकट झाली आहे,’ असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रियांका सहस्रभोजनी यांनी सांगितले.
‘मनोरुग्णांना आवश्यक ती औषधे मिळविण्यास अवघड जात असल्याने वेळच्या वेळी औषधांचे सेवन केले जात नाही. त्यामुळेही त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे; तसेच सतत एकत्र राहावे लागत असल्याने जोडप्यांमधील वाद वाढले असून, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनाही घडत आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक गणित बिघडल्याने ताण आणि अस्वस्थता वाढली आहे.
या संकटानंतरही ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’ (पीटीएसडी) वाढण्याची शक्यता आहे; कारण या काळात अनेकांनी आपला रोजगार गमावला असून, पुन्हा पायावर उभे राहण्यासाठी त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत, असे मनोविकारतज्ज्ञ प्रकृती पोद्दार यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times