‘काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारमध्ये एलपीजीची किंमत ४१४ रुपये होती आणि ८२७ रुपयांचे अनुदान होते. आता सिलिंडर एक हजार रुपयांपर्यंत गेला आहे आणि अनुदान शून्य आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी काँग्रेस सरकारने जे काही केले होते, ते सर्व काही मोदी सरकारने बाजूला सारले आहे. लाखो नागरिकांना महागाईची झळ बसते आहे. देशात बेरोजगारीही प्रचंड आहे. प्रशासन सर्वच आघाडीवर अपयशी ठरले आहे. सध्याचा भारत महागाईमुक्त भारत नसून, महागाईंयुक्त भारत आहे, असे राहुल म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनीही पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. भाजप हा अतिशय श्रीमंत पक्ष आहे. मात्र, या देशातील नागरिक गरीब आहेत, असहाय्य आहे. भाजपच्या कार्यकाळात तीनवेळा गॅसची दरवाढ झाली. एलपीजी सिलिंडर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. पेट्रोल, डिझेल, इंधनांच्या किमती सातत्याने वाढत आहे. त्यात आता गॅस दरवाढीचा भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सामान्यांशी काही घेणेदेणे नाही, त्यांनी विदेश दौऱ्यातून आल्यावर तातडीने गॅसच्या किमती वाढवल्या. मोदी सरकारने तातडीने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘भाजपकडून नागरिकांची फसवणूक’
जयपूर: भारतीय जनता पक्ष देशातील सर्वसामान्यांची फसवणूक करीत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सरकार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काहीही करीत नाही, अशी टीका राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केली आहे. गॅसच्या दरात झालेली वाढ म्हणजे गरीब नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असेही पायलट म्हणाले.