महाराष्ट्रानं देशाला दिशा दाखवणारे विचार दिले आहेत. हेरवाड या गावाने महाराष्ट्रासह देशाला दिशा दाखवणारा निर्णय घेतला आहे. आगामी काळात हेरवाडचा आदर्श महाराष्ट्रभर घेतला जावा अशी अपेक्षा व्यक्त करते. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा सांगणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीनं घेतलेल्या ‘विधवा प्रथा बंद’ या निर्णयाचं मी स्वागत करते, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
हेरवाड ग्रामपंचायतीचा विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय, ग्रामपंचायतीचा ठराव
महाराष्ट्र राज्याची संपूर्ण देशभरात पुरोगामी राज्य अशी ओळख आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवणारे विचार दिले आहेत. रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार अशा अनेक गोष्टींची सुरुवात आपल्या राज्यात झाली आणि त्या योजना देशाने स्वीकारल्या. कोल्हापुरातील हेरवाड गावानं महाराष्ट्रासह देशाला दिशा दाखवणारा निर्णय घेतला आहे. हेरवाड ग्रामपंचायतीनं विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा सांगणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीनं घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक करण्यात येत आहे. आगामी काळात हेरवाडचा आदर्श महाराष्ट्रभर घेतला जाऊ शकतो.
विधवा प्रथा रद्द करण्यामागची भूमिका
हिंदू धर्मातील चाली रितीनुसार पतीच्या निधनानंतर अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे तसेच हातातील बांगड्या फोडल्या जातात. पायातील जोड़वी काढणे तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही, ही परिस्थिती आहे. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे महिलांच्या अधिकारांवर गदा येत आहे. म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे. याचापार्श्वभूमीवर आपल्या गावामध्ये तरी विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, या करीता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. या संदर्भात गावामध्ये जनजागृती करणेत यावी. त्यास ही सभा मंजूरी देत आहे, असा ठराव मंजूर करण्यात आला.
रवाड ग्रामपंचयातीचे संरपंच सुरगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुक्ताबाई संजय पुजारी यांनी ठराव मांडला. तर, सुजाता केशव गुरव, यांनी अनुमोदन दिलं आहे.