मुंबई : वांद्रे पश्चिम, बँडस्टँड येथे सोमवारी आग लागलेल्या जिवेश सोसायटीत आग प्रतिबंधक उपाय कागदावरच असल्याचे आढळून आले आहे. अग्निसुरक्षा नियमांची पूर्तता न केल्याबद्दल मुंबई अग्निशमन दल सोसायटीला लवकरच नोटीस पाठवणार आहे. (Mumbai Fire Update)

बँडस्टँड येथे अभिनेता शाहरूख खान याच्या मन्नत बंगल्याजवळ जिवेश इमारत आहे. इमारतीच्या १४व्या मजल्यावरील घरात सोमवारी रात्री आठच्या सुमारास आगीचा भडका उडाला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने स्तर-२ची आग जाहीर करण्यात आली होती. सोमवारी रात्री उशिरापर्यंत इमारतीतील २१ रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. यामध्ये ११ पुरुष आणि १० महिलांचा समावेश आहे. तर, मुंबई अग्निशमन दलाचे जवान कुशल रजपूत (३१) यांना धुरामुळे त्रास झाल्याने पालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईत एनसीबी पुन्हा सक्रीय; तरुण-तरुणींच्या टोळीला अटक करत मोठी कारवाई

ही आग घरातील इलेक्ट्रिक वायरिंगमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, महाराष्ट्र अग्निसुरक्षा प्रतिबंधक कायदा २००६ नुसार प्रत्येक इमारतीला अग्निशमन यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे. अचानक आग लागल्यास इमारतीतील अग्निशमन यंत्रणेद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न करणे तसेच अग्निशमन दलाला आग विझविण्यासाठी सहाय्यक ठरण्यासाठी आग प्रतिबंधक यंत्रणा आवश्यक आहे. जिवेश इमारतीत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत अग्निशमन दलातर्फे सोसायटीला नोटीस पाठवली जाणार आहे. आगीच्या घटनेची स्थानिक पोलिस व अग्निशमक दलाचे अधिकारी तपास करत असल्याचे दलातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here