बीड : अंबाजोगाई तालुक्यात १२ वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. दिपाली रमेश लव्हारे (वय १७, रा. पट्टीवडगाव ) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. गावातील एका रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून मुलीने हे टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर संशयित तरूणावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दिपाली लव्हारे हिने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. दिपालीचे वडील राज्य परिवहन मंडळात चालक असून सध्या पालघर येथे कार्यरत आहेत. दिपालीची आई सुमित्रा यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घराशेजारी राहणारा अकबर बबन शेख हा तरुण मागील काही दिवसापासून दिपाली कॉम्प्युटर क्लासला जात-येत असताना तिला छेडत होता. रस्त्यात अडवून सदर तरुणाकडून त्रास दिला जात होता. हा प्रकार दिपालीने आईला सांगितला होता.

नगरमध्ये घरातच सुरू होती जनावरांची कत्तल; पोलिसांनी अचानक धडक दिली आणि…

दिपालीच्या वडिलांनी शुक्रवारी ( ०६ मे ) अकबरला बोलावून घेऊन तिला त्रास न देण्याबद्दल बजावले होते. परंतु त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. त्याचे त्रास देणे सुरूच होते. त्यावर वडील आणि भाऊ आला की आपण यातून मार्ग काढूत अशी आईने तिची समजूत घातली. अखेर सततच्या त्रासाला कंटाळलेल्या दिपालीने मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आई गावातील जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेली असल्याने घरात कोणी नसताना घरात साडीने गळफास घेतल . रात्री ११ वाजताच्या सुमारास आई घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली .

दरम्यान, नातेवाईकांच्या मदतीने दिपालीला स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले. सदर फिर्यादीवरून अकबर बबन शेख याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास बर्दापूर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here