नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. आमचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत त्यांना देऊ असं शरद पवार म्हणाले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेवरील राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपल्यानंतर पत्रकार परिषद घेत नवी राजकीय भूमिका जाहीर केली होती. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांची जून महिन्यात होणार आहे. या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपचे २, शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी होईल. सहाव्या जागेवर मला पाठिंबा द्यावा, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं. संभाजीराजे छत्रपती यांना रायगड जिल्ह्यातील अपक्ष आमदारानं देखील पाठिंबा जाहीर केला आहे.

शरद पवार काय म्हणाले ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमचा एक प्रतिनिधी निवडून येण्यास अडचण नाही. संभाजीराजेंना उरलेली मत देण्यात येतील, असं पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी पाठिंबा दिल्यानंतर इतर पक्ष काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. आज रायगड जिल्ह्यातील उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.

राज्यसभेच्या द्वीवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. देशभरातील ५७ जागांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातील ६ जागांचा त्यामध्ये समावेश आहे. शिवसेनेचे संजय राऊत, भाजपचे पीयूष गोयल, विकास महात्मे, विनय सहस्त्रबुद्धे ,राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे पी.चिदंबरम यांचा कार्यकाळ संपल्यानं ६ जागांवर निवडणूक होत आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीनुसार भाजपचे २, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा १ उमेदवार विजयी होईल. तर, सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी भाजपकडे नाही. त्यामुळं सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावा सांगितला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं घोषणा करताना महाविकास आघाडी सरकार आणि भाजपकडे पाठिंबा मागितला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here