मुंबई : पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गायब झालेले मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना न्यायालयात आजही दिलासा मिळाला नाही. या दोघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर (Pre Arrest Bail Application) आज सुनावणी झाली. मात्र याबाबतचा निकाल १९ मे रोजी देण्यात येणार आहे. त्यामुळे देशपांडे आणि धुरी यांच्यावरील अटकेची तलवार कायम राहिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध करत ४ मे रोजी पक्षातील कार्यकर्त्यांना मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यभरात पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. याच दिवशी शिवाजी पार्क येथे पोलीस ताब्यात घेत असताना संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी आपल्या खासगी वाहनातून पोलिसांसमोरच पळ काढला. यावेळी झालेल्या गोंधळात एक महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर पडून जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या या दोन्ही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसंच त्यांच्या अटकेसाठी पथकंही तयार केली. मात्र अद्याप हे दोघे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला परवानगी देणार का, गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले…

दरम्यान, अटक टाळण्यासाठी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र १० मे रोजी त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आज ही सुनावणी झाली. मात्र या प्रकरणी न्यायालय १९ मे रोजी आपला निकाल देणार आहे. यावेळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना दिलासा मिळतो की अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

धमकीच्या पत्रानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सुरक्षा वाढवली, ठाकरे सरकारचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here