परभणी : जिवंत असतानाही कुणी तरी एका शेतकऱ्याला कागदोपत्री मृत म्हणून दाखवले आणि सरकारी योजनेला तो मुकून बसला. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्याला आपण हयात आहोत हे पटवून देण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. मागील दहा महिन्यापासून आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी तो प्रशासन दरबारी खेटे मारत आहे. त्या ६५ वर्षीय शेतकऱ्याचं नाव सीताराम ज्ञानोबा सुरवसे असं आहे.

परभणी तालुक्यातील काष्टगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी सीताराम सुरवसे मागील दहा महिन्यापासून प्रशासन दरबारी खेटे मारत आहेत. त्यांच्याकडे ३ एकर शेती असून ते अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २ हजार रुपये प्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात.

सर्वसामान्यांना आणखी एक झटका; जेवणाच्या ताटातील चपाती महागली, गव्हासह पिठाच्या दरातही वाढ
आतापर्यंत शेतकऱ्यांना अकरा हप्ते मिळाले आहेत. शेतकरी सन्मान योजनेचे सहा हप्ते सीताराम सुरवसे यांना सुरळीत मिळाले. पण, त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे येणे बंद झाले. सुरवसे यांनी शेतकरी सन्मान योजनेच्या पोर्टलवर चौकशी केली. त्यावेळी त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली. सीताराम सुरवसे हे मृत झाल्याचे सर्टिफिकेट पोर्टलवर अपलोड करण्यात आले. या सर्टिफिकेटमुळे त्यांना या योजनेच्या लाभापासून अपात्र ठरविण्यात आले. आपण हयात आहोत त्याची माहिती या पोर्टलवर भरावी आणि ते मृत सर्टिफिकेट कुणी अपलोड केले याची माहिती मिळावी म्हणून गेले दहा महिने ते प्रयत्न करत आहेत.

माहितीच्या अधिकाराचा वापर करून, अनेक ठिकाणी अपील करूनही त्यांना अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही असा आरोप सुरवसे करत आहेत. आपल्याला मिळणारा २ हजार रुपयांचा सन्मान निधी परत मिळावा यासाठी त्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत.

मागील दहा महिन्यांपासून ते प्रशासनाकडे खेटे मारत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी कागदपत्रे जमा केली. पण त्यांना अद्याप न्याय न मिळाल्याने त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे व कार्यकर्त्यांची मदत घेतली. आपण जिवंत आहोत आणि खाऊ पिऊ शकतो हे दाखविण्यासाठी सुरवसे यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयात बसून भाजी भाकर खाऊन आंदोलन केले. सीताराम सुरवसे यांच्या प्रकरणाच्या रूपाने परभणी जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. मात्र, आता तरी प्रशासनाने वेळीच दखल घेऊन हेलपाटे वाचवावेत अशी मागणी सीताराम सुरवसे यांनी केली आहे.

लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गोठ्यावर वीज कोसळल्याने गोठा जळून खाक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here