शहाबाज पंजाबी यांनी का बदलला निर्णय?
राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे नाराज होऊन शिवसेनेत गेलेल्या शहाबाज पंजाबी यांनी लगेच आपली भूमिका का बदलली, याची पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत स्वत: पंजाबी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मला माझ्या गुरूचा फोन आला आणि मला बोलून घेतलं. माझ्या गुरूने मला सांगितलं की, बाबा हा धार्मिक विषय नाही. हा विषय सर्व समाजासाठी आहे. हे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहेत. राज ठाकरे जे बोलत आहेत ते योग्य बोलत आहे. तू अशी काही भूमिका घेऊ नकोस. बाळा तुझी काहीतरी चूक झाली असेल, मात्र तू आपल्या घरातीलच सदस्य आहेस, आपला पक्ष हे आपले घर आहे. १६ वर्ष घरात काम केलेलं आहे. पुन्हा पक्षात ये आणि व्यवस्थित काम कर, असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे मी पुन्हा मनसेत येण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं शहबाज पंजाबी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, शहाबाज पंजाबी हे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मनसेने हनुमान चालीसासंदर्भात आंदोलन जाहीर केल्यानंतर कोंढवा परिसरात हनुमान चालीसा लावू देणार नाही, असं वक्तव्य शहाबाज पंजाबी यांनी केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आपली भूमिका जाहीर केल्यानंतर ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले त्यांमध्ये पंजाबी यांचाही समावेश होता. मनसेने जर हनुमान चालीसा लावला, तर आमची मुले तयार आहेत, असं प्रतिआव्हानही पंजाबी यांनी दिले होते. या वक्तव्यानंतर मनसेने पंजाबी यांच्याविरोधात कोंढवा पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. हेच शहाबाज पंजाबी पुन्हा स्वगृही परतणार असल्याने त्यांचे पक्षात नक्की कसे स्वागत होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.