भुल भूलैय्या २ या सिनेमाची प्रेक्षकांच्या मनात खूपच उत्सुकता होती. मनोविकार तज्ज्ञ डॉ. आदित्य आणि भुताची बाधा झालेली मंजुलिका यांची केमिस्ट्री १५ वर्षांपूर्वी भन्नाट जुळली होती. अक्षय कुमार, विद्या बालन, अमिषा पटेल आणि शायनी आहुजा यांनी या सिनेमाची चौकट पूर्ण केली होती. सिनेमाच्या दुसऱ्या भागात मात्र सगळेच कलाकार बदलण्यात आल्याने सिनेमा आवडेल की नाही ही शंका सिनेमाच्या टीमच्या मनात होती. पण भुल भूलैय्या २ च्या नव्या संचातील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकण्यात बाजी मारली.
भुल भूलैय्या २ या सिनेमात कार्तिक आर्यनचा भीतीदायक नखरा प्रेक्षकांना खूप आवडल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. सिनेमातील आदित्यची भूमिका बजावण्यात कार्तिकला सूर सापडल्याचे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरील कमेंटमध्ये म्हटलं आहे. दोन वर्षांपासून या सिनेमाची चर्चा सुरू होती, अखेर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येताच प्रेक्षकांनी आर्यनवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
तब्बूचा अभिनयही आवडल्याचे प्रेक्षकांनी टवीटर, इन्स्टा या सोशल मीडियावर सांगत या सिनेमाचं कौतुक केलं आहे. अक्षयकुमार तर चांगला होताच पण कार्तिकने निराशा केली नाही असं काही नेटकऱ्यांनी म्हटल्याने सध्या कार्तिकला आकाश ठेंगणं झालं आहे. तर कियारा आणि कार्तिकची ऑनस्क्रिन केमिस्ट्री छान वाटत असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.