मुंबई: राज्यसभेतील सहाव्या जागेवरील संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरुन निर्माण झालेला पेच आता संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. संभाजीराजे यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती(Sambhajiraje Chhatrapati) आता शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून राज्यसभेवर जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. (Rajyasabha Election 2022 in Maharashtra)

संभाजीराजे यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. संभाजीराजे यांचा मुक्काम सध्या मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आहे. काहीवेळापूर्वीच शिवसेनेचे अनिल देसाई, उदय सामंत आणि मिलिंद नार्वेकर या तीन नेत्यांचे शिष्टमंडळ संभाजीराजे यांच्या भेटीसाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहे.
भूमिका बदलली आणि शब्द फिरवला नाही तर ते शरद पवार कसले?: निलेश राणे
राज्यसभेवर निवडून जायचे असेल तर संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. अन्यथा आम्ही सहाव्या जागेवर आमचा उमेदवार रिंगणात उतरवू, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. मात्र, संभाजीराजे यांनी,’मला शिवसेना नको तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करा’, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. ही मागणी अखेर उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्याची माहिती समजत आहे. याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, याच फॉर्म्युलावर शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात समझोता झाल्याची माहिती समोर येत आहे. आता संभाजीराजे लवकरच पत्रकारपरिषद घेऊन यासंदर्भात घोषणा करु शकतात.
”अटी घालून शिवसेनेकडून संभाजीराजेंचा गेम करण्याचा प्रयत्न तर नाही ना?”
संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची घोषणा केली होती. सध्याच्या संख्याबळानुसार राज्यसभेच्या सहा जागांपैकी दोन जागांवर भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा उमेदवार प्रत्येकी एका जागेवर निवडून येईल. तर सहावी जागा जिंकण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावा सांगितला होता. ही जागा जिंकण्यासाठी संभाजीराजे यांनी सर्वपक्षीय आमदारांना मदत करण्याचे आवाहन केले होते. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजीराजे यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, त्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका बदलत आपण शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, असे सांगितले होते. त्यामुळे संभाजीराजे यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग खडतर झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here