सुरतमधील वरछा भागात रस्त्यावर उतरून स्थलांतरीत मजुरांनी मंगळवारी पुन्हा ठिय्या आंदोलन केलं. आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या, अशी मागणी ते पोलिसांकडे करत होते. वरछा भागात हिऱ्यांना पॉलिश केली जाते. या ठिकाणी देशभरातून कामासाठी हजारो मजूर येत असतात. कपड्यांच्या अनेक कंपन्याही या भागात आहेत. तिथेही मजूर कामासाठी येत असतात.
मजुरांना त्यांच्या गावी जायचं आहे. लॉकडाऊन असल्याने ते जाऊ शकत नाही. यामुळे संयम बाळगा असं आम्ही त्यांना सांगतोय. यापैकी काही जणांनी जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. पण आम्ही एनजीओची मदत घेऊन तातडीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. तसंच त्यांना जेवणाची पाकिटंही दिली. आता इथली परिस्थिती नियंत्रणात आहे, असं घटनस्थळावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
मजुरांच्या आंदोलनाची माहिती मिळताच सुरतमधील स्थानिक आमदार आणि आरोग्य राज्यमंत्री किशोर कनानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. ओडिशा, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील असलेल्या या स्थलांतरीत मजुरांना त्यांनी विश्वासात घेतलं. लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार असं त्यांना वाटलं होतं. म्हणून ते घरी जाण्याची मागणी करत होते, असं कनानी यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times