मुंबई: भाजप हा एक गमतीशीर पक्ष आहे. ते कोणत्या गोष्टीचा इव्हेंट करतील याचा भरवसा नाही. लोकांच्या प्रश्नांवर आंदोलन करणे हा तर विरोधी पक्षाचा हक्क आहे. पण भाजपवाले आंदोलनाच्या नावाखाली इव्हेंटच जास्त करत असतात, अशी टीका शिवसेनेकडून (Shivsena) करण्यात आली आहे. औरंगाबादमधील पाणीप्रश्नानावरुन भाजपकडून काढण्यात आलेल्या जलआक्रोश मोर्चाचा (Jal Akrosh Morcha) शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून समाचार घेण्यात आला आहे.

यामध्ये शिवसेनेने भाजपवर चांगलेच आसूड ओढले आहेत. भाजपने संभाजीनगरात आधी औरंगजेबाच्या थडग्याचा इव्हेंट केला. तो संपला नाही तोच, पाण्याच्या प्रश्नावर जलआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. जलआक्रोश मोर्चात लोकांची पाण्यासाठी सुरु असलेली लोकांची तडफड दिसणे अपेक्षित होते. पण इथे एखादी शोभायात्रा निघावी व आनंद उत्सव व्हावा असेच वातावरण होते. सजवलेल्या उंट-घोड्यावरून शेळ्या मेंढ्या हाकण्याचे काम सुरु होते. भाजपपुरस्कृत महिला नटून-थटून हातात घागरी घेऊन फुगड्या वगैरेचा जलआक्रोश करत होत्या. रिकाम्या घागरींचे नेपथ्यही चांगले होते. पण औरंगाबादची जनता यामध्ये सामील झाली नाही, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
संभाजीनगरचा पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही झोपणार नाही, सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही: फडणवीस
या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आंदोलन करताना त्यामागील हेतू शुद्ध हवा. पण जलआक्रोश मोर्चाबाबत तसे म्हणता येईल का? देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जलआक्रोश मोर्चामागे अशुद्ध आणि गढूळ झालेल्या राजकारणाचा भाग होता, अशी टीकाही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
Video: दानवेंचा रुद्रावतार, बोनेटवरुन खाली उतरले, कार्यकर्त्यांना झापलं, पुन्हा बोनेटवरुन गाडीत बसले!

‘तुम्हीही आमच्यासोबत २५ वर्षे सत्तेत होतात’

औरंगाबाद महानगरपालिकेत तुम्हीही आमच्यासोबत सत्तेत होतात, अशी आठवण शिवसेनेकडून भाजपला करुन देण्यात आली आहे. केंद्रात यूपीए सरकार असताना शिवसेनेच्या पुढाकाराने समांतर जलवाहिनीची योजना अस्तित्त्वात आली. जनतेला किफायतशीर दरात आणि नियमित पाणी मिळाले असते. मात्र, या योजनेचे श्रेय शिवसेनेला मिळेल, या पोटदुखीतून ही योजनाचा बंद पाडण्यात आली, असा आरोप शिवसेनेने केला. तसेच औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेनेसोबत भाजपनेही अनेक वर्षे महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या माध्यमातून सत्ता उपभोगल्याची आठवण शिवसेनेने करुन दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here