लॉकडाऊन व संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत भाजीपाला विक्रीसाठी नेणे मुश्कील झाले आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन प्रशासन नियमाच्या अधीन राहून शेतकऱ्यांना उत्पादित शेतीमाल विक्रीची व्यवस्था करत आहे. कुरकुंडी येथील इस्माईल पटेल हा शेतकरीही आपल्या शेतातील काकडी विक्री करण्यासाठी घारगाव येथे गेले असता त्यांना याबाबत वेगळाच अनुभव आला.
घारगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना हा शेतमाल विक्री न करता नदीत फेकण्यास सांगितले. या प्रकाराने हा शेतकरी हतबल झाला आहे. लॉकडाऊनमुळे माझ्या साडेतीन एकर शेतातील उत्पादित झालेली काकडी कशी विक्री करायची, असा प्रश्न माझ्यापुढे उभा ठाकला असून अशाप्रकारे विक्री व्यवस्थेत येणाऱ्या अडथळे येत असल्याने मोठे नुकसान होत आहे, अशी व्यथा या शेतकऱ्याने बोलून दाखवली. शासनाने याबाबत नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे शेतकऱ्यांत तीव्र पडसाद उमटत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times