मातोश्रीवर या, शिवबंधन बांधा, असा निरोप छत्रपती संभाजीराजेंना शिवसेनेकडून देण्यात आला होता. मात्र संभाजीराजे मातोश्रीवर गेले नाहीत. संभाजीराजेंचा हा पवित्रा शिवसेनेला अपेक्षित होता. त्यामुळेच त्यांच्या जागी संजय पवारांचं नाव निश्चित करण्यात आलं. पवार यांच्या निवडीमागे काही महत्त्वाची कारणं आहेत.
छत्रपतींच्या वारसांचा सन्मान राखला गेला नाही, अशी टीका होऊ शकते, याची शिवसेनेला कल्पना होती. ती टीका टाळण्यासाठी शिवसेनेनं बड्या नेत्याला उमेदवारी दिली नाही. राजे वि. सर्वसामान्य शिवसैनिक असं स्वरुप शिवसेनेनं या संपूर्ण प्रकरणाला दिलं आहे.
कोल्हापुरातील शिवसेनेचे कट्टर समर्थक अशी संजय पवारांची ओळख आहे. गेली २५ ते ३० वर्ष त्यांनी शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून काम केलंय. त्यांच्यावर सध्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी आहे. पक्षाने यंदा ग्रामीण भागातील शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवायचं ठरवलं. त्यामुळेच पवारांचं नाव चर्चेत आलं.
२०१९ मध्ये काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदींना थेट राज्यसभेवर पाठवण्यात आलं. पक्षात वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना संधी मिळत नाही. पण दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना लगेच संधी दिली जाते, असा सूर त्यावेळी उमटला होता. त्यामुळेही पवार यांची निवड महत्त्वाची ठरते. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जातो, असा संदेश सेनेनं पवारांच्या निवडीतून दिला आहे.
बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि उद्धवजींचा विश्वास, मी आज भरुन पावलो : संजय पवार