‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

वांद्रे येथे मंगळवारी झालेल्या प्रकाराबाबत केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलून पळ काढण्याची राज्य सरकारची भूमिका दुर्दैवी आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.

वांद्रे स्थानकाबाहेर हजारो मजूर रस्त्यावर जमा होणे ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना पुरेसे जेवण, सुविधा देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. तशी व्यवस्था होत नसल्याचे अनेक दिवसांपासून आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. तरीही राज्य सरकारने तसे उपाय केलेले नाहीत. राज्य सरकारने यातून धडा घ्यावा, अशी टीका फडणवीस यांनी केली.

यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी. अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल, तर ते आणखी दुर्दैवी आहे. करोनाविरुद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल, ही पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे, असे फडणवीस म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here