जवळपास ३६ वर्षांपूर्वी भोपाळमध्ये भयंकर वायू दुर्घटना घडली होती. भोपाळमध्ये करोनामुळे मृत्युमुखी पडलेले पाचही जण वायू दुर्घटनेतून सहीसलामत बचावले होते. परंतु, भोपाळ मेडिकल हॉस्पीटल ऍन्ड रिसर्च सेंटर (BMHRC) मध्ये पाऊल ठेवण्याची संधीही त्यांना मिळाली नाही. BMHRC मध्ये वायू दुर्घटनेशी निगडीत रुग्णांसाठी खास सेवा दिली जाते. परंतु, करोना संक्रमणाशी निगडीत वाढती संख्या लक्षात घेता सरकारनं या रुग्णालयात कोविड १९ रुग्णांसाठी खास सोय केली आहे.
भोपाळमध्ये मंगळवारी करोनामुळे मृत्यू झालेल्या अशफाक नदवी हे ७३ वर्षांचे होते. ते जहांगीराबाद भागाचे रहिवासी होते. याच भागात राहणारे इमरान आणि राजकुमार यादव हे दोघेदेखील करोनाचे बळी ठरलेत. तर पीडित ५५ वर्षीय नरेश खटीक भोपाळमधले करोनाचा पहिला बळी ठरले होते. ७ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. विषारी वायूच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना आजीवन श्वसनाचा आजार जडला होता.
त्यानंतर ७७ वर्षीय जगन्नाथ मॅथिल हे भोपाळमधील करोनाचे दुसरा शिकार ठरले होते. विषारी वायू पीडित जगननाथ हे इब्राहिमपुरा आणि चौकी इमामवाडा भागात राहत होते. या दोन भागांत तसंच जहांगीराबादमध्ये वायू पीडित मोठ्या संख्येनं राहतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढलीय. त्यांनी या भागात सॅनिटायझेशनचं काम सुरू केलंय. सोबतच या भागाती ५० – ६० हजार लोकांचं स्क्रिनिंगही सुरू करण्यात आलंय.
दरम्यान, मध्यप्रदेशातही करोनाचं संक्रमण वाढताना दिसत आहे. आत्तापर्यंत राज्यातील करोनाबाधितांची संख्या ७५७ वर पोहचलीय तर ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वात जास्त मृत्यू इंदोरमध्ये नोंदवण्यात आले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times