शिवसेनेचे महत्त्वाचे नेते

अनिल परब हे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते मानले जातात. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे असल्याचंही मानले जाते. त्यामुळं अनिल परब यांच्यावर ईडीने केलेली ही कारवाई शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीने छापे मारले आहेत. यात अनिल परब यांचे मुंबईतील शासकीय, खासगी निवासस्थानाबरोबरत पुणे आणि दापोलीतील मालमत्तांचाही समावेश आहे.
सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा

अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापे टाकले आहेत. यामध्ये अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान आणि वांद्रे येथील घराचाही समावेश आहे. ईडी अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा घेऊन शिवालय या बंगल्यावर सकाळीच दाखल झाले. अनिल परब सध्या याचठिकाणी उपस्थित असल्याचे कळते. ईडी अधिकाऱ्यांच्या पथकात सहाय्यक संचालक तासीन सुलतान यांचाही समावेश आहे. तासीन सुलतान हेच अनिल देशमुख प्रकरणातील तपासाधिकारी होते.
अनिल परब यांची याआधीही चौकशी

अनिल परब यांना यापूर्वीही ईडीने मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावला होता. तसंच, ते चौकशीसाठी उपस्थितही झाले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपये खंडणीच्या आरोपप्रकरणी चौकशी करायची असल्याचं ईडीने तेव्हा म्हटलं होतं. बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे याच्या चौकशीत अनिल परब यांचं नाव समोर आलं होतं. त्यामुळं काही महिन्यांपूर्वी ईडीने अनिल परब यांना समन्स बजावले होते. ईडीला अनिल परब यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय होता.
ईडीला संशय काय?

मुंबई महापालिकेतील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये खंडणी गोळा करण्याची सूचना अनिल परब यांनी जानेवारी २०२१ मध्ये दिली होती, असे बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने न्यायालयाला सांगितले आहे. या सर्व माहितीनुसार, यामध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा संशय आहे. त्यामुळं ईडीने अनिल परब यांच्याविरोधात कारवाई केल्याची शक्यता आहे.
साई रिसॉर्टबाबतचे आरोप काय?

अनिल परब यांच्या कोकणातील दापोली तालुक्यातील मुरुड साई रिसॉर्टवरही ईडीने छापे मारले आहेत. आज सकाळी सहाच्या सुमारास ईडीचे तीन पथक साई रिसॉर्टमध्ये दाखल झाले होते. अनिल परब यांचे आर्थिक हितसंबंध गुंतल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने केला होता. या रिसॉर्टची जमीन अनिल परब यांनी विभास साठे यांच्याकडून विकत घेतली व नंतर ही जमीन उद्योजक सदानंद कदम याना विकली व या जागेवर साई रिसॉर्ट उभे राहिले हे अनिल परब यांच्या नावावर नसले तरीही केंद्रीय पर्यावरण विभागाच्या सीआरझेड उल्लंघन दाव्यात अनिल परब यांचे नाव आहे यामध्ये आर्थिक घोटाळा आरोप व हितसंबंध असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.