काय आहे आरोप?
विभास साठे यांच्याकडून अनिल परब यांनी दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्याला लागून असलेली जागा खरेदी केली होती. काही दिवसांनी परब यांनी ही जागा खेड येथील त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांनी विकली. त्यावर सदानंद कदम यांनी अलिशान असे साई रिसॉर्ट उभा केले. हे रिसॉर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचा भंग करण्यात आल्याची तक्रार भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाकडे केली होती. या तक्रारीनुसार पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मुरूड येथे जाऊन पाहणी केली आणि पर्यावरण मंत्रालयाला अहवाल सदर केला होता. त्यानंतर पर्यावरण कायद्याचा भंग करून बांधण्यात आलेले हे साई रिसॉर्ट तोडून टाकावे, असे आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिले होते आणि दापोली न्यायालयात यासंदर्भात एक खटलाही दाखल केला आहे.
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुरुड येथील ही जागा उद्योजक सदानंद कदम यांना विकलेली असली तरी त्यामध्ये परब यांचे हितसंबंध असल्याचे आरोप किरीट सोमय्या यांनी वारंवार केले आहेत. मध्यंतरी आयकर विभागाने केलेल्या चौकशीत साई रिसॉर्ट बांधण्यासाठी केलेल्या खर्चाबाबतही माहिती घेतली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले आहेत. या चौकशीत नेमकी कोणती माहिती ईडीच्या हाती लागली आहे, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times