कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार येथील संतोष मुधोळ यांचे गावापासून काही अंतरावर १२ एकर शेत आहे. शेता जवळूनच कालवा गेल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देता येते. संतोष मुधोळ यांचा मुलगा देवानंद हा शनिवारी ( ता. २१ मे ) रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. त्यानंतर रविवारी (ता. २२ मे) त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
कुटुंबावरच घेतला संशय
देवानंद शेतात असताना तेथे कोणी आले नव्हते. तसेच मृत देवानंद याचे कोणाशी वैरही नव्हते, त्यामुळे पोलिसांनी घरातील व्यक्तीवर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी मृत देवानंद यांचे वडील संतोष मुधोळ यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
डोक्यात घातले कुऱ्हाडीचे घाव
देवानंद यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची त्याने पोलिस चौकशीत सांगितले. पोलिसांनी त्याची आधी चौकशी सुरू केली असून खुनात वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यासाठी पोलिसांचे पथक गौळ बाजारकडे रवाना झाले आहे.
बकरा विक्रीवरुन होता वाद
मागील दोन वर्षापासून देवानंद हा शेती करत होता. वडिलांनी घेतलेले कर्जही त्याने फेडले होते. तर वडिलांना यापुढे कोणीही पैसे देऊ नये, असे त्याने सर्वांना बजावून सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच संतोष मुधोळ याने बकरा विक्री केला होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यातूनच संतोष यांनीच मुलगा देवानंद यांचा खून करून काटा काढल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे.
पोलिसांसमोर होते आव्हान
घटनास्थळी कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना खुनाचा उलगडा करणे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होते. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शना खाली यातिष देशमुख, कळमनुरीचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे, सहायक निरीक्षक रोयलावार, उपनिरीक्षक सोनुळे, जमादार घ्यार, एस. पी. सांगळे यांच्या पथकाने तपास सुरू केला व खूनाचा उलगडा केला.
अंगावर शहारे, डोळ्यात पाणी आणणारा सरसेनापती हंबीरराव