राज्यात लॉकडाऊन लागू आहे. इतर राज्यांतील लाखो मजूर ठिकठिकाणी अडकले आहेत. त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय राज्य सरकारकडून केली जात आहे. मात्र, काल, मंगळवारी अचानक मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर हजारो मजूर जमले. आम्हाला गावी जायचं आहे. परवानगी द्यावी अशी मागणी करत, त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेरच ठिय्या मांडला होता. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीनं दाखवलेल्या वृत्तामुळं वांद्रे रेल्वेस्थानकात गर्दी झाल्याचा दावा अनेकांनी सोशल मीडियावर केला. लॉकडाऊनमुळं अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी जनसाधारण विशेष ट्रेन सोडण्यात येणार असल्याचं वृत्त काल प्रसारित केलं होतं. दक्षिण मध्य रेल्वेच्या पत्रकाच्या आधारे वृत्त दिल्याचं कुलकर्णी यांनी वार्तांकन करताना सांगितलं होतं. या वृत्तामुळंच हजारो मजुरांची गर्दी रेल्वे स्थानकाबाहेर जमली, असा दावा अनेकांनी केला होता. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी कुलकर्णी यांच्याविरोधात अफवा पसरवल्याप्रकरणी अजामीनपात्र गुन्हा दाखल केला होता. आज वांद्रे पोलिसांनी उस्मानाबाद पोलिसांच्या मदतीनं राहुल कुलकर्णी यांना ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राजतिलक यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times