मुंबई: देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संयमी नेते आहेत. त्यांना काही वाटत असेल किंवा गैरसमज झाले असतील तर त्यांनी ते व्यक्त करायला हवेत. त्यांनी अशा गोष्टी मनात ठेवू नयेत, अशी अपेक्षा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. पंकजा मुंडे या रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत टॉक’ या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीसांचा एक चांगला गुण आणि त्यांच्यासाठी एक सल्ला काय असेल, अशी विचारणा पंकजा यांना करण्यात आली. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केले. (BJP leader Pankaja Munde in Mumbai event)

काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याविषयी सकारात्मक संकेत दिले होते. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे का, याबद्दलच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तेव्हा पंकज यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा मुंडे यांनी म्हटले की, अजिबात नाही. सध्या जे चालू आहे ते पाहता मी आहे तिथेच बरी आहे, असे पंकजा यांनी म्हटले. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांना गाण्याचा आग्रह धरण्यात आला. तेव्हा पंकजा मुंडे यांच्या गाण्याची निवडही चर्चेचा विषय ठरला. ‘हमारी मुठ्ठी मै आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा’ या गाण्याच्या ओळी पंकजा यांनी गुणगुणल्या. तसेच मी राजकारणात असल्याने गाणे गाण्याची गरज नाही. तशीही तिथे मोठी गर्दी आहे, अशी टिप्पणीही पंकजा मुंडे यांनी केली.
पंकजा मुंडेंची आणखी एक संधी हुकली, भाजपने राज्यसभेची नावं जाहीर करताच म्हणाल्या…

पंकजा मुंडे विधानपरिषदेत जाणार?

येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २, काँग्रेसचा एक आणि १० व्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस होऊ शकते. यावेळी भाजपकडून पंकजा मुंडे यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंकजा मुंडेही या जबाबदारीसाठी इच्छूक आहेत. मला विधान परिषदेवर पाठवावं, ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

यापूर्वी पंकजा मुंडे यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे वक्तव्य केले होते तेव्हा भाजपमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलली होती. मात्र, यावेळी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा सूर सकारात्मक दिसत आहे. पंकजा मुंडे आमच्या मोठ्या नेत्या आहेत. आमच्याकडून त्यांच्या नावाला पूर्ण पाठिंबा आहे. अशा काही निवडणुका होतात, तेव्हा त्यांचं नाव चर्चेत येतं. ते साहजिकच आहे. त्यांचं नाव चर्चेत येणं यात काहीच वावगं नाही. त्या कोणत्याही पदासाठी पात्र आहेत. आमच्या त्यांच्या नावाला पाठिंबा आहे. आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत. याबद्दलचा निर्णय आमचे हायकमांड घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here