मुलीचं अपहरण का केलं?
उषा चव्हाण हिला दोन मुले व दोन मुली आहेत. तिच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून तिच्या लग्नात तिने ३० हजार रुपये हुंडा घेतला होता. त्यांच्या समाजामध्ये मुलीचे लग्न करताना मुलाच्या वडिलांकडून हुंडा घेण्याची प्रथा आहे. या कारणासाठी ती लहान मुलीला पळवून नेऊन तिला भिक्षा मागण्यासाठी लावणे तसंच नंतर तिचे लग्न करताना हुंडा मिळावा, यासाठी आरोपी महिलेने थेट मुलीचे अपहरण केले. मात्र या सराईत गुन्हेगार असणाऱ्या उषा चव्हाण हिच्या मानसुब्यांवर पोलिसांनी पाणी फेरलं आहे. ही कामगिरी उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहाय्यक निरीक्षक दीपाली भुजबळ, प्रेरणा कुलकर्णी, उपनिरीक्षक अमोल घोडके, सहाय्यक फौजदार दिनेश शिंदे, नामदेव खिलारे, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बालाजी घोडके, संदीप जढर, विशाल गाडे, अझरुद्दीन पठाण, ज्योती राऊत यांनी केली.
सीसीटीव्ही कॅमेरे अन् पिशवीवरील नाव ठरले धागा
उषा ही सराईत गुन्हेगार आहे. तिने मुलीचे अपहरण केल्यानंतर कॅमेर्यात येऊ नये म्हणून काळजी घेतल्याचं दिसून येत आहे. प्रत्येकवेळी तिने आपला चेहरा झाकून घेतला आहे. केवळ मुलगी तिच्या काकाला दिसून येत होती. मुलीच्या कपड्यांवरून पोलीस तिचा पाठलाग करत होते. यावेळी पोलिसांनी तब्बल २५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. स्टेशन परिसरात उषा एका व्यक्तीसोबत बोलताना दिसून आली. त्याचवेळी तिच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीवर बगाडे रिटेलर्स असे नाव दिसून आले. बगाडे नावाच्या पिशवीचा शोध घेतला असता, ती नगर जिल्ह्यात असल्याचे दिसले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे श्रीगोंदा तालुक्यातील कापसे वस्ती येथून पोलिसांनी उषाला ताब्यात घेतले.