अहमदनगर : चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मराठा आणि धनगर आरक्षणाचा मार्ग सुकर होण्यासाठी केंद्रात आपलं वजन वापरण्याची विनंती केली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या पण सध्या जीर्ण झालेल्या वास्तूंचा सरकारने जीर्णोद्धार करावा. सोलापूरमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राला जादा निधी द्यावा. तसंच आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा वाढविण्यासाठी शरद पवार यांनी आपले वजन वापरून केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत. त्यामुळे मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
चौंडीतील आजच्या अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाचा मी संयोजक नाही, कार्यक्रम समितीने आयोजित केला आहे, मी केवळ एक कार्यकर्ता, असं रोहित पवार यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. देशात १३० पेक्षा जास्त मंदिरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली, महिलांची सोय व्हावी यासाठी कित्येक ठिकाणी नदीवर घाट बांधले. दुष्काळात मंदिर किंवा घाट बांधण्याचे काम करून त्यांनी रोजगारही उपलब्ध करून दिला. अहिल्यादेवींच्या राज्यात धार्मिक आणि जातीभेद नव्हता. हल्लीच्या राजकारण्यांनी त्यांच्याकडून ही शिकवण घ्यावी, असा टोला रोहित पवार यांनी आपल्या राजकीय विरोधकांना लगावला आहे.
मागील पाच वर्षांत चौंडीतील विकास कामे थांबली होती. गेल्या दोन वर्षांत ती पुन्हा मार्गी लागली. भविष्यात चौंडीत अहिल्यादेवींचे संग्रहालय उभारण्याचे नियोजन आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमावेळी समस्त धनगर समाजाच्या वतीने शरद पवार यांचा काठी आणि घोंगडी देऊन पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. तसंच चौंडी ग्रामस्थांच्या वतीनेही मोठा पुष्पहार घालून पवार यांचा सत्कार करण्यात आला.