-उत्कर्ष जोशी

० क्वारंटाइन काळातला तुझा दिनक्रम कसा असतो?

आयती महिनाभर सुट्टी मिळाल्यावर साहजिकच आपलं मन आणि शरीर अधिक आळसावतं आणि दिवस असेच निघून जातात हे मला जाणवलं. मग मी स्वतःला थोडी शिस्त लावून घेतली. साधारणपणे सकाळी साडेआठला उठल्यानंतर नाश्ता, जेवणाची तयारी आणि जेवण होईपर्यंत दुपार निघून जाते. संध्याकाळचा वेळ मात्र बऱ्यापैकी हातात असतो. मग थोडा व्यायाम करते. एखादी फिल्म अथवा वेब सीरिज बघून घेते आणि जास्तीत जास्त रात्री बारा वाजेपर्यंत झोपायचा माझा प्रयत्न असतो.

० नवीन काम किंवा छंद यांना कसा वेळ देतेस?

बऱ्याच दिवसांपासून मला स्वतःचं युट्यूब चॅनल काढायची इच्छा होती. या निमित्तानं मला त्याबाबतीत थोडा अभ्यास करायला वेळ मिळाला, त्यामुळे मी खूश आहे. सध्या मी अॅने फ्रँकची डायरी ऑडिओ बुक स्वरूपात ऐकतेय. यातून माझा प्रयत्न हा आहे, की ज्या स्थितीत सध्या आपण आहोत तशाच, किंबहुना त्याहून बिकट परिस्थितीत राहिलेल्यांनी दिवस कसे काढले ते जाणून घेऊन त्यावरुन प्रेरणा घेणं. शिवाय, मी सध्या कीबोर्ड शिकतेय.

० वेब सीरिजमधल्या तुझ्या भूमिकेवर काय प्रतिक्रिया येतायत?

अनेकांनी ‘डॅमेज्ड’ बघितली आणि मला भरपूर प्रतिक्रिया मिळाल्या. माझ्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय. माझ्यासाठी ती भूमिका नेहमीच खूप खास अशीच राहील. कारण त्या भूमिकेमुळे एकूणच वेगळा अनुभव मला मिळाला.

० सध्या वेळ कसा घालवतेयस?

गेलं वर्षभर मी खूप काम केलं आणि शिवाय खूप प्रवासही केला. काम आणि नातेवाईकांना भेटणं अशा वेगवेगळ्या कारणांनी माझं सहा देशांत फिरणं झालं. त्यामुळे एका अर्थी ही सक्तीची विश्रांती शरीराला आणि मनाला गरजेचीच होती, असं मी म्हणेन. मी ध्यानधारणा करतेच. एकूणच खूप विचार करते आणि आयुष्याकडून मला नेमकं काय हवंय, माझा दृष्टिकोन काय असावा याबद्दल निर्णय घेते. आईला स्वयंपाक किंवा इतर घरकामांमध्ये मदत करणं सुरू आहेच. त्यातून आनंद मिळतोय.

० ‘खतरों के खिलाडी’चा अनुभव कसा होता?

‘खतरों के खिलाडी’मध्ये काम करणं ही एका अर्थानं माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. माझा या खेळाप्रती दृष्टिकोन थोडा वेगळा होता. जेवढे टास्क मला जमतील तेवढे मी करेन अर्थात, त्यासाठी नक्कीच १०० टक्के प्रयत्न करेन. पण, त्याच वेळी माझ्या मर्यादाही मी ओळखून होते. रोहित सरांना मुळात मराठी कलाकारांबद्दल एक प्रकारची आपुलकी असल्यानं ते, माझ्याशी आणि तेजस्वीशी मराठीतच बोलायचे. शिवाय इतके छान स्पर्धक मिळाले होते, की आमच्यात एकमेकांबद्दल कुठेही असूया किंवा स्पर्धा नव्हती.

० या कठीण काळात तुझ्या चाहत्यांना काय काळजी घ्यायला सांगशील?

माझ्या मते आपल्याला देशसेवा करायची इतकी मोठी संधी याआधी कधीही मिळाली नव्हती. आपल्याला फक्त प्रशासनानं घालून दिलेले नियम पाळायचेत. नियमितपणे स्वच्छता पाळायची आहे आणि अगदी अत्यावश्यक असेल, तर आणि तरच, तेही मास्क लावूनच घराबाहेर पडायचं आहे. विषाणूबद्दल आपल्याला मुळात फार कमी माहिती आहे. अजून त्यावर लसदेखील मिळालेली नाही. त्यात अतिशय संसर्गजन्य असल्यानं तो विषाणू कुठल्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल ते कळणार नाही. त्यामुळे घरी राहा, स्वच्छता पाळा आणि सुरक्षित राहा.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here