पुणे : ‘प्रत्येक परिस्थितीत आणि काळात महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा देण्याचे काम केले. सामाजिक न्याय आणि समतेबरोबरच देशाला संविधान या राज्याने दिले. सध्या सत्तेसमोर सगळेच नतमस्तक होत असताना देशाचा इतिहास बदलू पाहणाऱ्यांविरोधात महाराष्ट्रातील तरुण लढा देण्याचे काम करील,’ अशी अपेक्षा काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी व्यक्त केली.
कन्हैया कुमार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पुरोगामी महाराष्ट्रातील तरुणांनी देशाला दिशा दाखवावी, असे आवाहन केले. कन्हैया कुमार म्हणाले, ‘लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेवर येऊन एकाधिकारशाही निर्माण केली जात आहे. प्रश्न विचारला, की तुम्हाला देशद्रोही ठरविले जात आहे. इतिहास बदलण्याचे काम होत आहे. महागाई, बेरोजगारी या समस्यांवर बोलायला कोणीही तयार नाही. प्रश्न विचारण्याचा तुमचा अधिकार तुम्ही जिवंत ठेवा.’