सासवड (पुणे) : सासवड येथील भिकाऱ्यांच्या खून प्रकरणात आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं आहे. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख स्वतः लक्ष घालून शनिवारी दिवसभर सासवड येथे येऊन तपासाबाबत माहिती घेत सूचना दिल्या. तसंच या प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्यात आला आहे.

सासवड येथील भोंगळे वाईन्ससमोर २४ मे रोजी तीन भिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र नागरिकांनी याबाबत सखोल तपासाची मागणी केल्यानंतर पोलीस तपासात मृत लोकांना मारहाण झाल्याचे समोर आले. त्यामुळे सासवड येथील हॉटेल चालक निलेश जगताप याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे-सोलापूर महामार्गावर शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या वाहनाला अपघात

या प्रकरणात सुरुवातीला तपास पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे होता. त्यानंतर हा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी स्वतः कडे घेतला. मात्र हा तपास आता भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपी निलेश जयवंत जगताप याच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. दोन भिकाऱ्यांच्या मृत्यूने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार जगताप यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांनी हा खुनाचा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here