करोनाचा लढा सुरू झाल्यापासून राज ठाकरे हे सातत्यानं मुख्यमंत्री यांच्याशी संपर्कात असून सरकारला काही सूचना करत आहेत. राज यांनी बुधवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी बोलून काही गोष्टी निदर्शनास आणल्या. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘करोनाच्या आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या आश्वासक आहे. कल्याणमधील ६ महिन्यांच्या मुलीसह हजारो जण करोनामुक्त झाले आहेत. मात्र, ह्या आकडेवारीला सरकारी व इतर माध्यमांच्या पातळीवर पुरेशी प्रसिद्धी मिळताना दिसत नाही. ती मिळाली तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल आणि सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळेल, असं राज यांनी म्हटलं आहे. ‘आजार नियंत्रणात आहे हे दाखवलं गेलं तर नागरिक लगेच बाहेर पडतील हा समज चुकीचा आहे, असंही ते म्हणाले.
…तर सगळ्या उपाययोजना निष्प्रभ ठरतील!
करोनाच्या नुसत्या संशयावरून व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. हा प्रकार चुकीचा व सर्वांसाठीच नुकसानकारक आहे. असं होत राहिलं तर लोकांचा कल आजाराची लक्षणं लपवण्याकडे राहील आणि पर्यायाने लॉकडाऊनसकट केलेल्या अनेक उपाययोजना निष्प्रभ ठरतील. टी. बी. सारखे संसर्गजन्य आजार असतानाही रुग्णांना वाळीत टाकलं नाही, मग आत्ताच का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यावर उपाय म्हणून करोनामुक्त झालेल्या रुग्णांची आकडेवारी देणारं एक ‘न्यूज बुलेटिन’ आठवड्यातून एकदा जारी केलं जावं. माध्यमांनी देखील ह्या मुद्द्याच गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times