आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव या सराईत गुन्हेगाराचा यात समावेश आहे. तर दुसरा गुन्हेगार हा मावळ परिसरातील सौरभ महाकाळ असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. २३ वर्षीय संतोष जाधव हा मूळचा आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पोखरी गावचा आहे. मात्र, त्याचे वास्तव्य मंचर मध्ये होते. मंचर पोलिस स्टेशन हद्दीत राण्या उर्फ ओमकार बानखीले यांचा १ ऑगस्ट २०२१ रोजी खून करण्यात आला होता. या खुनात सहभागी असल्याचा गुन्हा त्यावर दाखल आहे. तसेच मंचर पोलीस ठाण्यात एक खंडणीचा, चोरीचा गुन्हा देखील दाखल आहे. राण्या बाणखेले खुनाच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला असून तो फरार आहे. या प्रकरणात त्याला तडीपार करण्यात आले होते. तेव्हापासून तो राजस्थान, पंजाब हरियाणा या भागात वास्तव्यास होता. येथे त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ग्रामीण तरुणांवर लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रभाव…
पुण्याच्या ग्रामीण भागात तरुणांवर लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रभाव असल्याचं समोर येत आहे. आज कालचे तरुण या गँगच्या मोहोरक्याप्रमाणे आपला पर्सनॅलिटी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. कपाळावर लाल कुंकू, दाढी साधारण वाढलेली, अंगावर काळे कपडे, गळ्यात काळी शाल, रुद्राक्षाची माळ, बंदुकी बरोबरचे फोटो असा पेहराव साधारण या गॅंगचा असतो. संतोष जाधव सुध्दा त्या गॅंगशी निगडित आहे. याशिवाय त्याने मंचर परिसरात गँग देखील तयार करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समोर येत आहे.
‘वडील गेल्यानंतर तो कोणाच ऐकत नव्हता’…
‘माझे विचार त्याला पटले नाही. अनेक वेळा त्याला विनंती केली पण तो ऐकत नव्हता. अनेक वेळा प्रयत्न केले पण त्याने आमचा विचार केला नाही. तो त्यांच्या वडिलांनाच जास्त घाबरत होता. मात्र, वडील गेल्यानंतर तो कोणाच ऐकत नव्हता. आमची आणि त्याची शेवटची भेट दीड वर्षांपूर्वी झाली होती. त्याला जास्त मित्रांमध्ये राहण्याचं आवडत असे. आमच्या दोघांबरोबर तो कधीच राहिलाच नाही, असं संतोषच्या आईने सांगितलं आहे.