वांद्रे इथं जमण्यासाठी मजुरांना चिथावणी देणारा उत्तर भारतीय संघटनेचा नेता विनय दुबे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या गर्दीच्या घटनेवरून विरोधक सरकारवर टीका करत असले तरी मनसेनं मात्र संयम पाळला आहे. याउलट मनसे अध्यक्ष राज ठाकरे वेळोवेळी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना सूचना करत आहेत. काही गोष्टींकडं सरकारचं लक्ष वेधत आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या नेत्याप्रमाणेच सरकारशी सहकार्याची भूमिका घेतल्याचं सोशल मीडियातील पोस्टवरून दिसत आहे.
मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. तसंच, सरकारनं घालून दिलेले नियम पायदळी तुडवणाऱ्यांना इशाराही दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, ‘मुख्यमंत्री साहेब चांगलं काम करत आहेत. मात्र, कुणी महाराष्ट्राकडं वाकड्या नजरेनं पाहिलं किंवा महाराष्ट्राचं काही नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे हे लक्षात ठेवावं. ते विनंती करत नाहीत, थेट जाळ काढतात.’
रुपाली पाटील यांनी अलीकडंच जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी एका इंजिनीअरला झालेल्या मारहाणीचं समर्थन केलं होतं. ‘सोशल मीडियावर विकृत पोस्ट टाकणाऱ्या असल्या लोकांना ठेचलंच पाहिजे,’ असं त्यांनी म्हटलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times