मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाआधी अपक्ष आमदारांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आमच्याकडे पुरसे संख्याबळ असल्याने चारही उमेदवार निवडून येतील, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, या निवडणुकीत आम्ही राज्यातील सत्ताधाऱ्यांना धक्का देऊ, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय नाट्याची पुनरावृत्ती होत असल्याचं दिसत असून महाविकास आघाडीने पुन्हा एकदा आपलं हुकमी शस्त्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनतंर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची ऐतिहासिक आघाडी निर्माण झाल्यानंतर आमदार फुटू नयेत, यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली होती. मुंबईत महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक घेत जोरदार वातावरणनिर्मिती करण्यात आली आणि आमच्याकडेच स्पष्ट बहुमत असल्याचं या तीनही पक्षांनी भाजपला दाखवून दिलं होतं. यातून महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये सत्तास्थापनेचा आत्मविश्वास निर्माण झाला आणि आघाडीतील आमदार फुटण्याचा संभाव्य धोका टळला. आता राज्यासभा निवडणुकीसाठीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या रणनीतीचा अवलंब करण्याचं ठरवलं आहे. आज सायंकाळी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांसह इतर अपक्ष आमदारांची मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेस पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे हे आमदारांना मार्गदर्शन करतील.

Rajyasabha Election 2022: गिरीश महाजन भाजपचे संकटमोचक ठरणार का, हितेंद्र ठाकुरांची भेट ठरणार गेमचेंजर?

मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमदारांना काय आवाहन केलं?

‘शिवसेनेतील एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मी राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्याला विजयी करण्याची जबाबदारी तुमची आहे’, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना सोमवारी केले. शिवसेनेच्या सर्व आमदारांची वर्षावर बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या राजकारणाचा पाढा वाचला. भाजपने कितीही हातपाय आपटले तरीही आपणच जिंकून येणार, असा विश्वास त्यांनी यावेळी शिवसेनेच्या आमदारांना दिला. या बैठकीनंतर या आमदारांना रिट्रीट हॉटेलवर खासगी बसने पाठविण्यात आले. शिवसेनेचे समर्थक लहान पक्ष तसेच अपक्ष आमदांची बैठक घेऊन त्यांनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. ‘तुमच्या पाठिंब्यावरच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग उदयाला आला असून तो यशस्वीपणे सुरू आहे. त्यामुळे अशाच प्रकारे राज्यसभाच नव्हे तर पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये एकीचे बळ दाखवा, विजय आपलाच आहे’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here