नंदुरबार : विधानपरिषद निवडणूक जवळ आल्याने आता सर्वच पक्ष आपआपले पत्ते बाहेर काढत असून उमेदवारांची नावे समोर येत आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते उमेदवारीसाठी स्पर्धेत असताना आमशा पाडवी यांनी बाजी कशी मारली, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातील सेनेचा एक आक्रमक आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेले आमशा पाडवी यांच्या नावावर शिवसेना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून लवकरच शिक्कामोर्तब करेल, अशी माहिती आहे. आमशा पाडवी हे नंदुरबारचे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. मागील ३० वर्षांपासून ते अक्कलकुवा भागात कार्यरत असून त्यांनी पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी अनेक वर्ष मेहनत घेतली आहे. पाडवी हे अक्कलकुवा पंचायत समिती माजी सभापती होते.

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी बजावली कारणे दाखवा नोटीस, भाजप पदाधिकारी संतप्त

आमशा पाडवी हे सेनेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. शिवसेनेला नंदुरबार जिल्ह्यात उभं करण्याचं काम त्यांनी केल्याचं बोललं जातं. अक्कलकुवा हा अत्यंत दुर्गम भाग असून कोणतीही साधनं नसतानाही पाडवी यांनी या भागात शिवसेना रुजवण्याचं काम केलं आहे.त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ मध्ये आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र राज्याच्या राजकारण दिग्गज नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के. सी. पाडवी यांना त्यांनी कडवी झुंज दिली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमशा पाडवी यांनी ८० हजार ७७७ मते घेतली होती.

दरम्यान, नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. अगदी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या काळापासून नंदुरबारमधून काँग्रेसच्या राज्यातील निवडणूक प्रचाराला सुरुवात होते. त्यामुळे या जिल्ह्यात पाय रोवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाडवी यांना शिवसेनेने विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.

‘भाजपचा घोडेबाजार रोखायचाय, म्हणून खबरदारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here