यावेळी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार पहिल्याच फेरीत निवडून येतील, असा दावा केला. संध्याकाळी सात वाजता चित्र स्पष्ट होईल. राज्यसभा निवडणुकीसाठी काँटे की टक्कर, चुरस वगैरे असल्याचा केवळ भ्रम आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. आजच्या मतदानात हे आकडे स्पष्ट दिसतील. महाविकास आघाडीला ठरल्यापेक्षा जास्त मतं मिळाली तरी भाजप नेत्यांना धक्का बसू नये, हीच अपेक्षा करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले.
नेमकं काय घडलं होतं?
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना जिंकवून आणण्यासाठी एक-एक महत्त्वाचे असताना शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या भूमिकेत बदल केल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४२ मतांचा कोटा राखून ठेवला होता. त्यानंतर उर्वरित मतं ही शिवसेनेला दिली जाणार होती. मात्र, आता राज्यसभा निवडणुकीला अवघे काही तास उरले असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या मतांचा कोटा ४२ वरून ४४ इतका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार धोक्यात आला आहे. शरद पवार यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड संतप्त झाल्याची चर्चा होती.
ही शक्यता खरी ठरल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे दूरगामी पडसाद उमटण्याची शक्यता होती. राज्यसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री घडलेल्या या प्रकारामुळे आता ही निवडणूक प्रचंड रंगतदार होणार, असे बोलले जात होते. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे आता उद्धव ठाकरे हे प्रचंड नाराज झाले आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंत, अनिल परब, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी काहीवेळापूर्वीच शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रकाराविषयी प्रचंड नाराज असल्याचे शरद पवार यांना कळवल्याची चर्चा होती.