या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्या वकिलांना याचिकेवर सुनावणी होण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींकडे जाऊन विशेष एकल न्यायाधीश पीठ नेमण्याची विनंती करावी लागेल. असे विशेष पीठ नेमले जाण्याची प्रक्रिया वेळखाऊ असते. शिवाय नवाब मलिक यांच्या बाबतीतच अद्याप कोणताही सकारात्मक आदेश आलेला नसल्याने आणि विधानभवनात मतदान होण्यासाठी सायंकाळी ४ पर्यंतच वेळ असल्याने विशेष पीठ नेमण्याची विनंती मुख्य न्यायमूर्तींना करण्याच्या हालचाली करण्यास देशमुख यांचे वकील फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहे. परिणामी देशमुख यांना मतदानाचा दिलासा मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर झाली आहे.
मलिकांबाबत कोर्टाने काय सांगितलं?
मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्याकडून तातडीचा दिलासा देण्यात आलेला नाही. मात्र याचिकेत दुरुस्ती करून योग्य त्या कोर्टात जाण्याची मुभा दिली गेली आहे. तातडीच्या याचिका दुरुस्तीनंतर दुपारी १.३० वाजता अन्य कोर्टात मलिक यांची याचिका सुनावणीला जाण्याची शक्यता आहे.