‘फडणवीस आणि मोदींनी कारवाई केली तरी चालेल…’
सुजय विखे पाटील यांनी शिवसेनेला मदत करणार असल्याचं सांगताना पक्षालाच आव्हान दिलं आहे. ‘माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले. मला त्याची खंत वाटली नाही. केवळ पारनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच भाजप आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. जेव्हा केव्हा शिवसेनेवर संकट येईल, तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटे सोडणार नाही. यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल. असे बोलण्याची हिंमत ठेवणारा मी भाजपचा एकमेव खासदार आहे. ही हिंमत माझ्यामध्ये आहे, कारण मी येथील राजकारण ओळखतो. येथे विचारांचा वारसा आहे. तो वारसा टिकविण्यासाठी असे निर्णय घेणे आवश्यक आहे. यावर शिवसेनेची काय भूमिका असेल, हे मला सांगता येणार नाही. मात्र, शिवसेनेने येथे घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा असेल. गेल्या काळात पारनेर तालुक्यात शिवसेनेचा आमदार असताना मोठी कामे झाली. येणाऱ्या काळात कोणाची कशी आघाडी होणार हे माहिती नाही. मात्र, मी मात्र शिवसेनेसोबत राहण्यास ठाम आहे. यापुढे माझ्या तोंडून कधीही शिवसेनेवर टीका होणार नाही, याची ग्वाही देतो’, असंही डॉ. विखे पाटील म्हणाले.
सुप्रिया सुळे यांना टोला
शिवसेनेचे कौतुक करताना सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. या दोघांमध्ये एकदा लोकसभेत जुगलबंदी रंगली होती. त्यावेळी विखे पाटलांनी खाल्ल्या मिठाला जागावे, असे सुळे म्हणाल्या होत्या. तो धागा पकडून आज विखे पाटील म्हणाले, ‘कोणी तरी म्हटलं होते की आम्ही खाल्ल्या मिठाला जागत नाही. मी सांगतो की शिवसेनेने आम्हाला केलेल्या मदतीची जाणीव ठेवून मी शब्द देतो की यापुढील काळातही नगर जिल्ह्यातील शिवसेनेवर कधीही टीका करणार नाही. कारण आम्ही खाल्ल्या मिठाला जागतो. मात्र, जे कुटुंब आजपर्यंत कोणाच्याच मिठाला जागले नाही, त्यांच्या टीकेला आम्ही भीक घालत नाही,’ असंही डॉ. विखे म्हणाले.
सुप्रिया सुळेंनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन चर्चा करण्याचं कारण