शेवाळी येथील सागर भीमराव कोळी यांच्या चुलत शालकाचा विवाह वाल्मिकनगरमध्ये होता. तेथे हजर राहण्यासाठी ते मुलगी दिव्या हिच्यासह दुचाकीने आले होते. लग्न आटोपून ते वाडी खुर्द (ता. शिरपूर) येथे नातलगांना भेटण्यासाठी जात असताना वाडी बुद्रुक येथील नागमोडी वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या डंपरने त्यांना धडक दिली. दोघेही रस्त्यावर पडले आणि भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरखाली चिरडून सागर कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर दिव्या ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून धुळ्याला हलविण्यात आले आहे.
या भीषण अपघातानंतर भरधाव वेगाने चालत असलेल्या डंपरही उलटला आहे. सागर कोळी त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण, मुलगी व मुलगा आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.