सोलापूर : विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी अवघ्या काही मिनिटांची वेळ शिल्लक असताना सदाभाऊ खोत यांनी अर्ज माघारी घेतला आहे. खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपण अर्ज मागे घेत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं होतं. आता उमेदवारी मागे घेण्याचं नेमकं कारण खोतांनी स्पष्ट केलं.

मतांची गोळाबेरीज करणं कठीण गेलं असतं, म्हणून विधानपरिषद निवडणूकीतून माघार घेतली, असा खुलासा सदाभाऊ खोत यांनी केला. देवेंद्र फडणवीसांच्या साथीने मागे घेतलेली दोन पावलं नक्कीच चार पावलं पुढं टाकण्यासाठी असतील, अशी पुष्टीही खोतांनी जोडली.

सदाभाऊ खोत यांच्या माघारीनंतर आता भाजपचे ५ अधिकृत उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात असतील. म्हणजेच विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असतील.

भाजपची स्थिती काय?

भाजपकडे सध्या १०६ इतकं संख्याबळ असून काही अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. विधानपरिषदेत प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक आहेत. या गणितानुसार, भाजपचे पहिले ४ उमेदवार सहज निवडून येतील. तर पाचव्या जागेवरील प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी काही मतांची तजवीज करावी लागेल.

हेही वाचा : सदाभाऊ खोत यांची तलवार म्यान, विधान परिषदेचा अर्ज शेवटच्या मिनिटाला मागे
चार जागा जिंकण्यासाठी १०८ मतांची बेगमी करावी लागेल. तर प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी आणखी २७ मतांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे. पाचवी जागा जिंकण्यासाठी भाजपला १३० पेक्षा जास्त मतांची गरज लागेल. यामध्येच भाजपची बरीच दमछाक होईल. हीच परिस्थिती लक्षात घेऊन भाजपने सदाभाऊ खोत यांना अर्ज माघारी घ्यायला लावल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : संजय राऊत पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा म्हणतील : सदाभाऊ खोतांची उपरोधिक टीका

सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर ९ जून रोजी अर्ज दाखल केला होता. फडणवीसांच्या सांगण्यानुसार अर्ज भरला, त्यांनी सांगितलं तर पुन्हा माघारही घेऊ, असं त्यावेळीच सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : विधानपरिषद : सदाभाऊंचा उमेदवारी अर्ज मागे का? फडणवीस म्हणाले, चंद्रकांतदादांनी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here